भिलार गणात तिरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत प्रमुख पक्ष आमनेसामने
भिलार गणात तिरंगी लढत निश्चित; पंचायत समिती निवडणुकीत प्रमुख पक्ष आमनेसामने
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गण पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत निश्चित झाली आहे. भिलार गणातून पंचायत समितीसाठी विविध उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात वैशाली भिलारे, कौशल्या संभाजी भिलारे आणि सविता रामचंद्र गोळे यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात आता तीन उमेदवार कायम राहिले आहेत.
अर्ज माघारीनंतर भिलार गणातून पुनम निलेश गोळे या शिवसेनेकडून, वंदना प्रवीण भिलारे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर सुप्रिया अनिल भिलारे या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये थेट सामना होत असल्याने ही निवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण आधीच तापलेले असताना भिलार गणातील तिरंगी लढतीमुळे राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. स्थानिक विकासकामे, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारखे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
तीन उमेदवार रिंगणात असल्याने थेट मतांची लढत पाहायला मिळणार असून कोण उमेदवार मतदारांचा विश्वास संपादन करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून भिलार गणातील ही तिरंगी लढत महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीतील एक महत्त्वाची आणि चर्चेची लढत ठरणार आहे.
Comments
Post a Comment