हुमगाव कार्यकर्ता मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदेंचे आक्रमक भाषण; गावातील उमेदवारालाच प्राधान्य देण्याचे आवाहन
हुमगाव कार्यकर्ता मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदेंचे आक्रमक भाषण; गावातील उमेदवारालाच प्राधान्य देण्याचे आवाहन
मेढा प्रतिनिधी :
हुमगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी अत्यंत आक्रमक, आत्मविश्वासपूर्ण आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे भाषण केले. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत गावाच्या स्वाभिमानासाठी आणि स्थानिक नेतृत्वासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले.
मतदान करताना आपल्या गावातलाच उमेदवार निवडण्याचा ठाम निर्णय घ्या, असे सांगत आमदार शिंदे यांनी बाहेरच्या उमेदवाराला गावात प्रवेशही देऊ नका, अशी थेट भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली. गावाचा विकास, सन्मान आणि निर्णयक्षमता टिकवायची असेल तर नेतृत्व स्थानिकच असले पाहिजे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाषणादरम्यान दादागिरीवरही त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “आम्ही दादागिरीतूनच मोठे झालो आहोत, फक्त पदावर गेल्यानंतर सुसंस्कृतपणा राखतो,” असे सांगत कोणत्याही दबावाला किंवा दहशतीला घाबरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देत त्यांनी सांगितले की, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपली ताकद आणि अनुभव दोन्ही तयार आहेत.
पुढील काही दिवसांत निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याचे सांगत, सर्व पक्षांनी एकत्र येऊन ‘कोर कमिटी’ तयार करावी आणि एकमताने उमेदवार निश्चित करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मतभेद बाजूला ठेवून जावळीच्या हितासाठी एकजूट दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तरुण कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना आमदार शिंदे यांनी विशेष साद घातली. तरुणांनी एकदा ठरवले, तर समोरच्या उमेदवाराला मतदानाची संधीही मिळणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी पैसे वाटूनही निवडणूक जिंकता येणार नाही, इतक्या ताकदीने काम करा, असे आवाहन केले. तरुणांची ऊर्जा आणि प्रामाणिकपणा हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जावळीचा इतिहास आणि स्वाभिमान जपण्यावर भर देत आमदार शिंदे म्हणाले की, आपल्या आशीर्वादाने आणि देवीच्या साक्षीने महाराष्ट्रात जावळीचा नवा इतिहास घडवू. ही केवळ निवडणूक नसून जावळीच्या अस्मितेची लढाई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांना खंबीर पाठबळ देताना त्यांनी सांगितले की, कोणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आडवे करण्यासाठी शशिकांत शिंदे ठामपणे उभे आहेत. कार्यकर्त्यांनी निर्भयपणे काम करावे, आपण त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भाषणाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करताना आमदार शिंदे भावनिक झाले. “मी तुमच्यामुळे घडलो आहे आणि तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही. सामान्य माणसाने ताठ मानेने जगावे, हाच आपला उद्देश आहे,” असे सांगत त्यांनी भाषणाची सांगता केली. या मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी जावळीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Comments
Post a Comment