महाबळेश्वरमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; मात्र शालेय चित्ररथांची परंपरा पुन्हा दुर्लक्षित, नागरिकांत तीव्र नाराजी
महाबळेश्वरमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; मात्र शालेय चित्ररथांची परंपरा पुन्हा दुर्लक्षित, नागरिकांत तीव्र नाराजी
✍️संदीप देवकुळे
महाबळेश्वर प्रतिनिधी:
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन महाबळेश्वर शहरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाबळेश्वर नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात उपनगराध्यक्ष नासीर मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याशिवाय शहरातील विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
उत्साहपूर्ण वातावरण असले तरी यंदाच्या प्रजासत्ताक दिनावर एक मोठी खंत शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. महाबळेश्वरची अनेक दशकांची गौरवशाली शालेय चित्ररथांची परंपरा यंदाही पुन्हा सुरू न झाल्याने पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. करोना काळापासून खंडित झालेली ही परंपरा नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक पुन्हा सुरू करतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात तसे न घडल्याने निराशा अधिक गडद झाली आहे.
दिल्लीतील राजपथावरील चित्ररथांनंतर महाराष्ट्रात सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांची परंपरा जपणाऱ्या शहरांमध्ये महाबळेश्वरचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेले सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि देशभक्तीपर चित्ररथ हे महाबळेश्वरच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण ठरत होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देणारी ही परंपरा केवळ देखावा नसून राष्ट्रप्रेम, सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाणिवा रुजविण्याचे प्रभावी माध्यम होती.
“प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त ध्वजारोहण नव्हे, तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, संविधानाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्याचा दिवस आहे. शालेय चित्ररथ ही त्याची जिवंत शाळा होती,” अशी भावना अनेक पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली. चित्ररथांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असे, त्यांना संघभावना, शिस्त आणि समाजाभिमुख विचारांची शिकवण मिळत असे, असेही मत अनेकांनी मांडले.
या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासकीय काळात बंद पडलेली ही ऐतिहासिक परंपरा लोकनियुक्त नगरपरिषद पुन्हा सुरू करेल, अशी अपेक्षा असताना यंदाही कोणतीही पूर्वसूचना, नियोजन किंवा स्पष्ट भूमिका जाहीर न झाल्याने नाराजी वाढली आहे. पर्यटन शहर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरच्या सांस्कृतिक वैभवाचे जतन करण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर असताना अशा महत्त्वाच्या परंपरेकडे दुर्लक्ष होणे नागरिकांना खटकत आहे.
उत्सव साजरे करण्यापुरतेच लोकप्रतिनिधी मर्यादित राहणार की शहराच्या परंपरा, वारसा आणि सांस्कृतिक ओळख पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यापुढील काळात ही चूक सुधारून पुढील वर्षी शालेय चित्ररथांची परंपरा अधिक भव्य आणि नियोजनबद्ध स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी महाबळेश्वरवासीयांकडून होत असून, नगरपालिकेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment