नालासोपाऱ्यात संकटात सापडलेल्या मुलीला शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचा आधार; मानवतेचे दर्शन घडवणारी धावपळ
नालासोपाऱ्यात संकटात सापडलेल्या मुलीला शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचा आधार; मानवतेचे दर्शन घडवणारी धावपळ
संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी –
नालासोपारा येथे एका तरुण मुलीवर अचानक ओढावलेल्या भीषण संकटाच्या क्षणी शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानने दाखवलेली तत्परता आणि माणुसकी आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. वडील नसलेली, आईसोबत भाड्याच्या घरात राहणारी अश्विनी गावकर ही साधारण २० ते २२ वयोगटातील मुलगी अचानक आईला आलेल्या तीव्र अटॅकमुळे पूर्णपणे गोंधळून गेली. अटॅकमध्ये आई अर्धांगवायूग्रस्त होऊन बेशुद्ध अवस्थेत पडली होती. घरात दुसरे कोणीही नसल्याने आणि परिसरातील बहुतांश लोक महानगरपालिका निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हते.
घाबरलेल्या अवस्थेत अश्विनीने आपल्या इमारतीतील समाजसेवक श्री. जयेश पांचाळ यांना फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचे सचिव श्री. सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सचिवांनी प्रतिष्ठानच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना त्वरित कळवले. यानंतर अध्यक्ष श्री. शिवाजी शेलार आणि आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू व प्रशिक्षक श्री. सागर शेलार यांनी आपापली कामे बाजूला ठेवून क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयाकडे धाव घेतली.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीचे उपचार सुरू करून घेतले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच तिला पुढील उपचारासाठी के. ई. एम. हॉस्पिटल येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शिवाजी शेलार आणि सागर शेलार यांनी के. ई. एम. हॉस्पिटलचे डीन डॉ. सुनील कदम यांच्याशी थेट संपर्क साधला. परिस्थिती समजताच डॉ. कदम यांनी तात्काळ सहकार्याची भूमिका घेत रुग्णासाठी बेड उपलब्ध करून दिला.
सध्या तीन दिवसांपासून ही रुग्ण के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका बाजूला संपूर्ण परिसरात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या संकटग्रस्त मुलीच्या मदतीला कोणताही लोकप्रतिनिधी पुढे आला नाही. मात्र शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) चे पदाधिकारी संकटाच्या क्षणी धावून येत तिला आणि तिच्या कुटुंबाला आधार देणारे ठरले.
या घटनेमुळे शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची आणि मानवतेच्या भूमिकेची पुन्हा एकदा प्रचीती आली असून, राजकारणाच्या गदारोळातही माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment