उशिरा लागवड, ढगाळ हवामान आणि किडींचा तिहेरी फटका; महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक
उशिरा लागवड, ढगाळ हवामान आणि किडींचा तिहेरी फटका; महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक आर्थिक संकटात
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे स्ट्रॉबेरी पिकावर गंभीर परिणाम झाला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वाढलेल्या आर्द्रतेमुळे किडी व विविध रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारण्या कराव्या लागत आहेत. मात्र कीटकनाशके व औषधांच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून तो अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
चालू वर्षी पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा जास्त वाढला होता. जोपर्यंत पाऊस पूर्णपणे उघडत नाही तोपर्यंत स्ट्रॉबेरीची लागवड करता येत नसल्याने यंदा लागवड उशिरा झाली. उशिरा लागवड झाल्यानंतर आता अचानक ढगाळ हवामानाचा फटका बसल्याने पिकांची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असून अपेक्षित दर्जाची स्ट्रॉबेरी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे प्रमुख नगदी पीक असून तालुक्यातील अनेक कुटुंबांचे अर्थकारण पूर्णपणे याच पिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या एकीकडे पिकाचे नुकसान, दुसरीकडे उत्पादनात घट आणि तिसरीकडे बाजारपेठेतील दरातील अनिश्चितता असा तिहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खर्च वाढत असताना उत्पन्न घटत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ स्ट्रॉबेरीपुरता मर्यादित नसून हरभरा, गहू तसेच इतर बागायती पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ढगाळ हवामान, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील सततचे चढ-उतार यामुळे पिकांची वाढ खुंटत असून रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून तातडीच्या शासकीय मदतीची मागणी होत आहे. हवामान लवकर स्थिर झाले नाही आणि नुकसानभरपाई, तांत्रिक मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य मिळाले नाही, तर येत्या काळात महाबळेश्वर तालुक्यातील शेतीसमोर मोठे संकट उभे राहील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या शेतीला वाचवण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे.
Comments
Post a Comment