“माझं गाव माझी बातमी” इम्पॅक्ट :केळघर घाटातील जीवघेण्या धोक्याची दखल; तुटलेल्या संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
“माझं गाव माझी बातमी” इम्पॅक्ट : केळघर घाटातील जीवघेण्या धोक्याची दखल; तुटलेल्या संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
महाबळेश्वर प्रतिनिधी –
“माझं गाव माझी बातमी” या जनहितासाठी काम करणाऱ्या न्यूज पोर्टलच्या प्रभावी पत्रकारितेमुळे केळघर घाटातील असुरक्षित आणि तुटलेल्या संरक्षक कठड्यांचा गंभीर प्रश्न अखेर प्रशासनापर्यंत पोहोचला असून दहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीची तातडीने दखल घेत प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून केळघर घाटातील रस्त्यालगत असलेले संरक्षक कठडे तुटलेल्या आणि धोकादायक अवस्थेत असल्याने वाहनचालकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. धुके , अरुंद रस्ता आणि तीव्र वळणांचा घाटमार्ग यामुळे येथे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
हा संभाव्य धोका “माझं गाव माझी बातमी” या सदरातून ठळकपणे मांडण्यात आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. अपघात टाळण्यासाठी पहिल्या टप्प्यात तुटलेल्या संरक्षक कठड्यांच्या परिसरात फ्लेक्स लावून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक ठिकाणे स्पष्टपणे दर्शविण्यात आली आहेत. याचबरोबर संबंधित ठिकाणी नवीन संरक्षक कठडे दुरुस्त व बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांसह नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले असून, ही केवळ तात्पुरती उपाययोजना न राहता संपूर्ण केरळ घाटमार्गावरील संरक्षक कठड्यांची सखोल पाहणी करून कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याआधी वारंवार दुर्लक्ष झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठत होती, मात्र यावेळी बातमीच्या प्रभावामुळे तात्काळ निर्णय घेण्यात आल्याने “माझं गाव माझी बातमी” या न्यूज पोर्टलची ताकद आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, स्थानिक समस्यांवर ठामपणे प्रकाश टाकणारे आणि प्रशासनाला कृतीस भाग पाडणारे “माझं गाव माझी बातमी” हे पोर्टल लोकशाहीतील जबाबदार पत्रकारितेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. घाटमार्गावरील सुरक्षितता हा केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित विषय नसून प्रवाशांच्या जीवाशी संबंधित गंभीर बाब असल्याने भविष्यातही अशा धोकादायक ठिकाणांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक ती कामे वेळीच करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment