जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लवकरच; निवडणूक आयोगाकडून घोषणेची शक्यता
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लवकरच; निवडणूक आयोगाकडून घोषणेची शक्यता
सातारा विशेष प्रतिनिधी–
राज्यात नगरपालिका निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील टप्प्यातील निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही लवकरच होतील, अशी शक्यता बळावली असून त्याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसांत होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरावीक कालमर्यादेत घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यातील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपून बराच काळ लोटला असून सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची निवड करून लोकशाही मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामीण राजकारणाला पुन्हा एकदा मोठी चालना मिळणार असून, स्थानिक विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार, पक्ष संघटना आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून गावोगावी हालचालींना वेग आला आहे.
न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यास वाव नसल्याने राज्य निवडणूक आयोग लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment