मेटगुताड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ५१२ नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण
मेटगुताड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ५१२ नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण
मेटगुताड प्रतिनिधी, दि. १९ डिसेंबर २०२५
: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून मेटगुताड येथे गावातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्यविषयक महत्त्वाच्या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत उपसरपंच भिकन बावळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव ओंबळे तसेच सर्व सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिला बेलोशे मॅडम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या शिबिरामध्ये गावातील एकूण ५१२ नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरीब व गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार असून, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा आधार मिळणार आहे. शिबिराला माननीय गटविकास अधिकारी विभुते सर व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी चिकणे सर यांनी भेट देत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली.
या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी येथील आरोग्य सहाय्यक संजय चव्हाण, विजय गोंजारी, चेतन रांजणे, रुपाली नायकवडी, शितल रांजणे, किशोर सूर्यवंशी, चांदना गावच्या आशा सेविका सौ. धनश्री बावळेकर, सौ. वृषाली गोळे तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांची नोंदणी, माहिती संकलन व कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वैभव काळे साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.
Comments
Post a Comment