प्रतापगड रस्त्यावर वाहतूक कोंडीचा कहर; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा नागरिक-पर्यटकांना फटका
प्रतापगड रस्त्यावर वाहतूक कोंडीचा कहर; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा नागरिक-पर्यटकांना फटका
✍️प्रतापगड प्रतिनिधी :
पर्यटन हंगाम सुरू असतानाच प्रतापगड रस्त्यावर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. शालेय सहलींच्या बस, खासगी वाहने आणि दुचाकी यांचा बेधुंद ओघ एकाच अरुंद रस्त्यावर सोडल्याने वाहनांच्या रांगा मैलोनमैल पसरल्या. अनेक ठिकाणी वाहने तासन्तास अडकून पडली, नागरिकांना नाईलाजाने पायपीट करावी लागली आणि पर्यटकांचा सुट्टीचा मौल्यवान वेळ ट्रॅफिक जाममध्ये वाया गेला.
पर्यटनासाठी देशभरात ओळख असलेल्या या मार्गावर गर्दी वाढणार हे माहीत असतानाही प्रशासनाने कोणतेही पूर्वनियोजन केलेले दिसत नाही. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नव्हता. परिणामी, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि ‘जसे येईल तसे’ वाहनचालक आपली वाहने कोंबण्याचा प्रयत्न करत राहिले. अरुंद रस्त्यावर शालेय बस उभ्या राहिल्याने कोंडी अधिकच गंभीर बनली.
तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था, शालेय सहलींच्या बसांसाठी तसेच गर्दीच्या ठिकाणी किमान दोन-तीन ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती हे अगदी मूलभूत उपाय असूनही ते राबवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या निष्काळजीपणाचा फटका नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना बसत असताना प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर-प्रतापगड परिसरात पर्यटकांची गर्दी झपाट्याने वाढत आहे. अशा काळात वाहतूक नियोजन न करणे म्हणजे समस्यांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे या पर्यटनस्थळांची प्रतिमा मलीन होत असून प्रशासनाने अजूनही डोळे न उघडल्यास याचा फटका पर्यटन व्यवसायालाच बसेल, अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया नागरिक आणि पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment