लोकप्रतिनिधी पाच वर्षे काय करतात? म्हणूनच मतदार ‘लक्ष्मी दर्शन’ मागतो
लोकप्रतिनिधी पाच वर्षे काय करतात? म्हणूनच मतदार ‘लक्ष्मी दर्शन’ मागतो
✍️संदीप देवकुळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्या की उमेदवारांचा आटापिटा वाढतो, हात जोडले जातात, हसरे चेहरे दिसतात. मात्र सामान्य मतदाराच्या मनात एकच गहन प्रश्न घोळत असतो—निवडून गेलेले लोकप्रतिनिधी पाच वर्षे नेमकं काय करतात?
लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असायला हवेत, पण वास्तव वेगळंच चित्र दाखवतं. पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक नगरसेवक पालिकेच्या बैठकीत मोजकीच हजेरी लावतात. ठेके, कामांची बिले, परवानग्या आणि कमिशन याभोवतीच त्यांची सक्रियता दिसते. रस्ते खोदायचे, पुन्हा बुजवायचे, आणि बिलं काढण्यातच धन्यता मानायची—हेच चित्र वारंवार दिसतं. पाणी, कचरा, ड्रेनेज, घरपट्टीसारखे जिव्हाळ्याचे प्रश्न निवडणूक जाहीर होईपर्यंत मरणासन्न अवस्थेत ठेवले जातात.
विरोधात असताना सिंहासारखी गर्जना करणारे काहीजण सत्तेत गेल्यावर मांजर बनतात, हे महाबळेश्वरच्या जनतेने अनेक वर्षे अनुभवलं आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक यांसारखे मूलभूत प्रश्न कागदोपत्रीच मर्यादित राहतात. पाच वर्षे जनतेला विसरून, निवडणूक जवळ आली की हेच लोकप्रतिनिधी दारात उभे राहून विचारतात, “काही अडचण आहे का?”
याच पार्श्वभूमीवर सामान्य मतदाराच्या मनात प्रश्न उभा राहतो—“आम्हाला या पाच वर्षांत नक्की मिळालं तरी काय?” ना नीट रस्ते, ना वेळेवर पाणी, ना स्वच्छ शहर, ना उत्तर देणारा प्रतिनिधी. काम, विकास, पारदर्शकता दिसत नाही, तेव्हा मतदाराचं लक्ष हक्कांवर न राहता हातात काय पडतंय याकडे वळतं. इथूनच ‘लक्ष्मी दर्शन’ची अपेक्षा जन्माला येते.
ही मतदारांची नैतिक घसरण नाही, तर लोकप्रतिनिधींच्या अपयशाचं प्रतिबिंब आहे. जो प्रतिनिधी पाच वर्षे जनतेला गृहीत धरतो, त्याला जनता मतदानाच्या दिवशी हिशोबात मोजते. कामाचं दर्शन घडलं नाही, म्हणून मतदाराला लक्ष्मीचं दर्शन तरी हवं असं वाटतं. हा लाचखोरीचा गौरव नाही, तर पाच वर्षांच्या दुर्लक्षाचा परतावा असल्याची भावना जनतेत खोलवर रुजली आहे.
दुर्दैवाचं वास्तव असं की लोकप्रतिनिधी पैशांनी मत विकत घेतात आणि नंतर जनतेच्या नैतिकतेवर बोट दाखवतात. पण नैतिकता आधी सत्ताधाऱ्यांनी गमावली, मतदारांनी नाही, हे ते सोयीस्करपणे विसरतात. जनता सगळं पाहते, अनुभवते आणि म्हणूनच निवडणुकीत थेट हिशोब मागते.
ही आदर्श लोकशाही नाही, पण लोकप्रतिनिधींना जनतेने दिलेला हा थंड, शांत आणि जहरी धडा नक्कीच आहे.
Comments
Post a Comment