आंबेनळी घाटात शालेय सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात टळला; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांची गैरसोय
प्रतापगड | प्रतिनिधी
आंबेनळी घाटात शालेय सहलीसाठी आलेल्या खासगी बसचे चाक रस्त्यालगत असलेल्या नाल्यात अडकल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत बसमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच चालक यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र या प्रकारामुळे घाट परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
प्रतापगड दर्शनानंतर आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे मार्गक्रमण करत असताना घाटातील तीव्र वळणाचा योग्य अंदाज न आल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरत नाल्यात अडकली. बसमध्ये शालेय विद्यार्थी असल्याने क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि उपस्थितांनी तात्काळ मदतकार्य करत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसबाहेर काढले.
आंबेनळी घाटातील रस्ता अरुंद असून वळणांची संख्या अधिक असल्याने या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अवजड वाहने, खासगी गाड्या तसेच पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती. काही वेळानंतर क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले, त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आंबेनळी घाट हा पर्यटक, शालेय सहली तसेच अवजड वाहनांसाठी नेहमीच वर्दळीचा आणि संवेदनशील मार्ग मानला जातो. मात्र अनुभवाचा अभाव, घाटातील वळणांची पुरेशी माहिती नसणे आणि आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे घाट मार्गावर जाणाऱ्या शालेय बसेस व पर्यटक वाहनांसाठी अनुभवी चालकांची नियुक्ती करावी तसेच वाहतूक सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment