दुर्गम सह्याद्रीत शिक्षणाची उजळवण; जि. प. शाळा निपाणी येथे २९ वर्षांची अखंड शैक्षणिक सेवा
दुर्गम सह्याद्रीत शिक्षणाची उजळवण; जि. प. शाळा निपाणी येथे २९ वर्षांची अखंड शैक्षणिक सेवा
✍️संतोष मालुसरे
तापोळाप्रतिनिधी :
सह्याद्रीच्या कुशीत व शहरापासून दूर असलेल्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी येथे कांदिवली (मुंबई) येथील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय श्री. राकेशभाई शेठ यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. १९९६ पासून गेल्या तब्बल २९ वर्षांहून अधिक काळ कोणताही खंड न पडता ते या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निपाणी केंद्रांतर्गत येणाऱ्या निपाणी, आपटी, वाकी, फुरुस आणि हातरेवाडी या पाचही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास मिळावा, या उदात्त हेतूने श्री. राकेशभाई शेठ दरवर्षी न चुकता हे योगदान देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निपाणी गावचे श्री. धनंजय आप्पा पार्टे, माजी मुख्याध्यापक श्री. अशोक जांभळे सर, विष्णू पार्टे, वसंत उतेकर, श्रीरंग निपाणे, श्री. कोंडिबा निपाणे तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
या प्रसंगी निपाणी केंद्रातील पाचही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाबद्दल शिक्षक व पालकांनी श्री. राकेशभाई शेठ यांचे मनापासून आभार मानले. दुर्गम भागात शिक्षणाची गंगा अखंड प्रवाहित ठेवण्यासाठी अशा दातृत्वाची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी श्री. सखाराम मालुसरे, संतोष कदम, ज्योतिलिंग कोळी, वसावे, आनंद जाधव, कुलाळ मॅडम, कारंजकर मॅडम व प्रमोद कोटांगले सर यांनी आपली मनोगते व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.
Comments
Post a Comment