महाबळेश्वरमध्ये परगावच्या मतदारांचा वाढता प्रभाव; स्थानिक लोकशाहीसाठी मोठी डोकेदुखी
महाबळेश्वरमध्ये परगावच्या मतदारांचा वाढता प्रभाव; स्थानिक लोकशाहीसाठी मोठी डोकेदुखी
✍️ संदीप देवकुळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर — गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक मतदारांपेक्षा परगावच्या मतदारांचा वाढता प्रभाव ही अत्यंत गंभीर बाब ठरत आहे. शहरात वास्तव्यास नसलेले, अनेक वर्षांपूर्वी बदली होऊन गेलेले शासकीय कर्मचारी तसेच लग्न होऊन दहा–पंधरा वर्षे उलटूनही सासरी वास्तव्यास असलेल्या महिलांची नावे आजही मतदार यादीत कायम असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती केवळ आकड्यांचा खेळ नसून स्थानिक लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी ठरत आहे.
मतदार यादीतील या ‘भूतबंगल्यां’मुळे निवडणुकीच्या काळात घोडेबाजाराला खतपाणी मिळते. शहराशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नसलेले मतदार एका दिवसासाठी महाबळेश्वरमध्ये दाखल होतात, मत टाकतात आणि पुन्हा गायब होतात. विकास, पाणीटंचाई, वाहतूक, पर्यटन, स्थानिक उद्योग यांच्याशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, तेच शहराचे भवितव्य ठरवत असल्याचा प्रकार हा केवळ विरोधाभास नसून स्थानिकांवर होणारा अन्याय आहे.
या गलथान कारभाराचा थेट फटका स्थानिक व्यापारी, पर्यटन व्यवसायिक, छोटे उद्योजक आणि कायमस्वरूपी रहिवासी नागरिकांना बसतो. परगावच्या मतदारांना खूश ठेवण्यासाठी धोरणे आखली जातात, तर शहरातील खऱ्या आणि ज्वलंत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होते. परिणामी, महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळाचा विकास कागदावरच अडकून राहतो.
या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. इतक्या वर्षांपासून चुकीच्या नोंदी दुरुस्त न होणे हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नसून जबाबदारी झटकण्याची सवय दर्शवते. मतदार यादी शुद्धीकरणासाठी केवळ नोटिसा देणे पुरेसे नसून, घरभेटी, आधार व निवास पडताळणी आणि कालबद्ध व्यापक मोहीम राबवणे आता अपरिहार्य झाले आहे.
महाबळेश्वरचा कारभार परगावच्या मतांवर नव्हे, तर येथे वास्तव्यास असलेल्या, येथे कर भरणाऱ्या आणि शहराचा श्वास घेणाऱ्या नागरिकांच्या मतांवर चालला पाहिजे. अन्यथा लोकशाही नावाची ही व्यवस्था केवळ आकड्यांचा खेळ बनून राहील आणि वेळीच प्रतिबंध केला नाही, तर त्याची किंमत महाबळेश्वरला वर्षानुवर्षे मोजावी लागेल.
Comments
Post a Comment