राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक रणधुमाळी; १५ जानेवारीला मतदान, आजपासून आदर्श आचारसंहिता लागू
राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक रणधुमाळी; १५ जानेवारीला मतदान, आजपासून आदर्श आचारसंहिता लागू
मुंबई प्रतिनिधी –
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनुसार मुंबईसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यभरात तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या तपशीलानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. २ जानेवारी २०२६ हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे, तर ३ जानेवारी रोजी उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार असून अवघ्या काही दिवसांतच प्रचार शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शासकीय जाहिराती, उद्घाटन समारंभ, नव्या योजनांची घोषणा तसेच शासकीय यंत्रणांचा प्रचारासाठी वापर करण्यावर कडक निर्बंध असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष गटांनी उमेदवारांची चाचपणी, जागावाटप, प्रचार रणनीती आणि संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी सुविधांचे मुद्दे या निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. आगामी काही आठवड्यांत राज्यातील राजकीय हालचाली अधिक तीव्र होत निवडणूक रणधुमाळी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment