“श्रमिक हक्कांच्या लढ्याचा धगधगता दीप विझला; समाजवादी विचारांचे प्रखर वाहक डॉ. बाबा आढाव यांचे निधन”
श्रमिक हक्कांच्या लढ्याचा धगधगता दीप विझला; समाजवादी विचारांचे प्रखर वाहक डॉ. बाबा आढाव यांचे निधन”
✍️विशेष प्रतिनिधी –
श्रमिक चळवळीचे अध्वर्यू, तत्त्वनिष्ठ समाजसेवक आणि असंघटित कामगारांचे थोर मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे आज (८ डिसेंबर २०२५) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी, पुरोगामी, श्रमिक आणि हक्क चळवळींचे एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
डॉ. बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी झाला. पुण्यातील अत्यंत साध्या भूमिकेतून त्यांनी समाजकारणाची वाट धरली. १९५३ मध्ये सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यानंतर ते १९७० पर्यंत समाजवादी पक्षाशी जोडलेले होते. पक्षीय राजकारणाने असंघटित, उपेक्षित आणि शहरी कष्टकरी घटकांच्या प्रश्नांना पुरेसे उत्तर न मिळाल्याची जाणीव होताच त्यांनी १९७० नंतर पक्षीय चौकटीबाहेर पडून स्वतंत्र, अराजकीय-राजकीय स्वरूपाचा मार्ग स्वीकारला. सत्यशोधक विचारांचा ठसा असलेली त्यांची सामाजिक आणि श्रमिक बांधणी महाराष्ट्रातील असंघटित कामगारांचे आयुष्य बदलणारी ठरली.
पुण्यासारख्या महानगरात भांडवली विकासाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या धोरणांना पर्यायी सामूहिक सत्ताकेंद्राची रचना त्यांनी सुरू केली. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, तसेच कागद-काच-पत्रा, टेम्पो कामगार अशा अनेक संघटनांद्वारे शहरी भागातील असुरक्षित, असंघटित कष्टकऱ्यांच्या संघटनांचे सबलीकरण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. कामगारांचे हक्क, ओळख, सुरक्षितता आणि स्वाभिमान या चार आधारस्तंभांवर उभी केलेली ही मोहीम महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीतील एक ऐतिहासिक टप्पा मानली जाते.
बाबा आढाव यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे राजकीय व्यवहार्यतेचे भान, संघर्ष आणि प्रबोधनाची संयुक्त वाटचाल, स्वायत्त सहकारी संस्थांद्वारे सामाजिक सुरक्षा उभारणे, संशोधन संस्थांच्या मदतीने धोरणात्मक मांडणी करणे आणि पक्षीय राजकारणात सहभागी न होता देखील समकालीन मुद्यांवर निर्भीड भूमिका मांडण्याचे धाडस. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेले त्यांचे समाजकारण जातविरोध, समानता, कामगारांचे हक्क आणि सामाजिक न्याय यांना केंद्रस्थानी ठेवणारे होते.
गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्रातील असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय, अभ्यासू आणि दिशादर्शक सहभाग राहिला. गरीब, कष्टकरी, स्वयंरोजगार करणारे, उपेक्षित आणि नडलेले घटक यांच्यापर्यंत स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा पोहोचवण्याचे बाबांचे कार्य पथदर्शक ठरले. त्यांच्या नेतृत्वातून उभी राहिलेली संघर्षात्मक आणि प्रबोधनात्मक चळवळ आजही अनेक संघटनांसाठी प्रेरणास्थान आहे.
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक धडाडीचा, नैतिकतेचा आणि तत्त्वनिष्ठतेचा समाजनेता गमावला आहे. असंघटित मजुरांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास समाजातील विविध स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
बाबा आढावांना विनम्र अभिवादन.
🙏🙏
Comments
Post a Comment