सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘तारा’चे स्वागत
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘तारा’चे स्वागत
ताडोबाहून वाघिणीचे यशस्वी स्थानांतरण; आठ वाघांच्या प्रस्तावित उपक्रमातील पहिली कामगिरी**
✍️ सूर्यकांत पवार,
कास प्रतिनिधी :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T-20-S-2 ही तरुण वाघीण ‘तारा’ (STR-T-04) या नावाने सह्याद्रीत दाखल झाली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा व पेंच येथून आठ वाघ सह्याद्रीत स्थानांतरणास मंजुरी दिल्यानंतर ‘ऑपरेशन तारा’ ही या मोहिमेतील पहिली मोठी व यशस्वी मोहीम ठरली.
ॲक्शन प्लॅन : शास्त्रोक्त निरीक्षण आणि सुरक्षित पकड
भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या मार्गदर्शनाखाली १५ नोव्हेंबर रोजी ही मोहीम राबविण्यात आली.
उदगाव नवीन परिसरात चार–पाच वर्षांची ही वाघीण प्रकल्पाबाहेर फिरू लागल्याने वनविभागाचे विशेष पथक तिच्यावर सतत लक्ष ठेवून होते.
सकाळी ८ वाजता ती एका ठरावीक भागात सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. त्यानंतर ताडोबा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी आवश्यक वैद्यकीय तपासणीस मंजुरी दिली. रक्त, आरोग्य व जैववैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ‘तारा’ ला विशेष तयार केलेल्या सुरक्षित ट्रान्सपोर्ट क्रेटमध्ये ठेवण्यात आले.
१००० किमीचा २४ तासांचा प्रवास — पूर्णतः सुरक्षित
१५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ‘तारा’ ला ताडोबाहून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी रवाना करण्यात आले.
सुमारे १००० किलोमीटरचा २४ तासांचा दीर्घ आणि संवेदनशील प्रवास पूर्ण करत ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता सुरक्षितरीत्या सह्याद्रीत दाखल झाली.
ही संपूर्ण प्रक्रिया NTCA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे पार पाडण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, वन कर्मचारी, WII तज्ज्ञ व NTCA पथकांनी सतत निरीक्षण ठेवले.
स्थानांतरणात सहभागी पथकाचा गौरव
या महत्त्वपूर्ण मोहिमेत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी नीलेश नलावडे, उपवनसंरक्षक संदेश पाटील, बाळासाहेब हाके, वनक्षेत्रपाल कार्तिक पाटील, प्रदीप कोळीकर, किरण मोगल, सागर गांडवे, आनंद वनवीरकर आदींचा मोलाचा सहभाग होता.
तसेच पायथॅगॉर कंझर्व्हन्सी, किर्लोस्कर कंझर्व्हेशन संधाम, पेंच व गडचिरोली येथील वन विभाग, तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तज्ज्ञांनी महत्वाची भूमिका बजावली.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
**तुषार चव्हाण
(क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प)**
“सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी हे स्थानांतरण एक महत्त्वाचा टप्पा आहे. ताडोबा व सह्याद्री प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक सहकार प्रशंसनीय आहे.”
**एम. एम. सूर्यवंशी
(प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र)**
“महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांत वाघ संवर्धन वाढवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना ‘तारा’चे आगमन नवी दिशा देईल.”
सह्याद्रीत वाघ संवर्धनासाठी नवा अध्याय
सह्याद्रीच्या व्याघ्र अधिवासात सुधारणा, जलस्रोत निर्मिती, शिकार प्राणीवर्धन व वैज्ञानिक पद्धतींच्या माध्यमातून व्याघ्र संरक्षणाला गती देण्याचे वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ताडोबा व पेंच येथून मंजूर आठ वाघांच्या स्थानांतरणातील ‘तारा’ ही पहिली आणि अत्यंत यशस्वी पायरी ठरली आहे.
Comments
Post a Comment