प्रतापगडाच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा दूरदर्शी निर्णय“आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देऊ; किल्ल्याच्या गौरवाला नवा उजाळा देणार”
प्रतापगडाच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा दूरदर्शी निर्णय
“आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देऊ; किल्ल्याच्या गौरवाला नवा उजाळा देणार”
✍️ जितेंद्र कारंडे ,
प्रतापगड प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे जिवंत प्रतीक असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धन, जनत आणि पर्यटनविकासासाठी खासदार तसेच प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नवा टप्पा ठरला आहे.
महाबळेश्वर परिसर दरवर्षी १८ ते २० लाख पर्यटकांना आकर्षित करतो. अशा या पर्यटन पट्ट्यातील प्रतापगडावर येणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या पर्यटकांना सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठी पुढाकार घेतली आहे. गडावर जाण्यासाठी रोपवे व फर्निक्युलर यंत्रणा, तसेच सुसज्ज वाहनतळ निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
या सुविधांसाठी जर जागेची आवश्यकता भासली, तर प्रतापगड देवस्थानची जमीन विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देऊन त्यांनी लोकहिताचा, विकासाभिमुख आणि दूरदर्शी दृष्टिकोन दाखविला.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंजूर झालेल्या १२७ कोटींच्या निधीचा सुयोग्य वापर करून प्रत्येक प्रकल्प पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले. या बैठकीला सह-अध्यक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, तसेच प्राधिकरणातील सर्व सदस्य उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, “प्रतापगड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, त्यांच्या पराक्रमाची आणि राष्ट्रनिष्ठेची साक्ष देणारा हा गड केवळ ऐतिहासिक नाही तर प्रेरणास्थान आहे. या गडाचा विकास करताना त्याचा मूळ ढाचा, इतिहास आणि पवित्रता अबाधित ठेवूनच कामे केली जातील.”
ते पुढे म्हणाले, “अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. सातारा जिल्हाही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. प्रतापगडासह महाबळेश्वर परिसराला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरण व प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.”
उदयनराजे भोसले यांनी बैठकीदरम्यान वनराई संवर्धनाचाही मुद्दा पुढे आणत, देवस्थान परिसरातील तोड झालेल्या वृक्षराजीचे पुन्हा संवर्धन करण्याचे निर्देश दिले. किल्ल्याभोवती स्वच्छता, पर्यटकांसाठी ई-बस सुविधा, लाईट अँड साऊंड शो, शिवराज्याभिषेककालीन भित्तीचित्रे अशा योजनांचा समावेश असलेला विकास आराखडा प्राधिकरणाने मंजूर केला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, “जिल्ह्यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा ३८१ कोटी ५६ लाख रुपयांचा मंजूर झाला असून त्यातील १२७ कोटी प्रतापगडाच्या जतनासाठी वापरले जातील.”
प्रतापगड किल्ल्याचा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उदयनराजे भोसले यांची ही भूमिकाच महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि गडसंवर्धनाचा आदर्श नमुना ठरणार आहे.
Comments
Post a Comment