देवळे येथील प्राचीन शिवमंदिरात ‘देव दिवाळी’चा सोहळा — हजारो पणत्यांच्या प्रकाशात झळकले महादेव मंदिर
देवळे येथील प्राचीन शिवमंदिरात ‘देव दिवाळी’चा सोहळा — हजारो पणत्यांच्या प्रकाशात झळकले महादेव मंदिर
✍️ प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी
पोलादपूर, दि. ७ :
शिलाहार काळात बांधले गेलेले देवळे येथील प्राचीन शिवमंदिर कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो पणत्यांच्या तेजाने उजळून निघाले. त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक दीपोत्सवाचे (देव दिवाळी) आयोजन ग्रामस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले. या निमित्ताने शिवमंदिर आणि सावित्री नदीचा परिसर दिव्यांच्या झगमगाटाने प्रकाशमय झाला.
सायंकाळी विधिवत पूजा-अर्चा, आरती व दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुभाष चित्रे यांच्या हस्ते त्रिपुर प्रज्वलित करण्यात आले. यावेळी रविंद्र केसरकर, शंकर केसरकर, लक्ष्मण केसरकर, राजाराम केसरकर, गणेश केसरकर, रामचंद्र पवार, संदिप पालकर, अनाजी केसरकर, रोशन कदम आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात लावलेल्या हजारो पणत्यांनी संपूर्ण परिसर तेजोमय झाला होता. सावित्री नदीच्या पाण्यावर पडलेले मंदिरातील दीपांचे प्रतिबिंब अतिशय मोहक दिसत होते. “हर हर महादेव” च्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते.
या सोहळ्याला धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी तारकासुराच्या तीन पुत्रांचे — तारक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली यांच्या त्रिपुरांचा नाश केला, अशी पुराणकथा आहे. त्यामुळे या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी दीपोत्सव म्हटले जाते. हा दिवस चांगुलपणाचा वाईटावर मिळविलेल्या विजयाचा आणि प्रकाशाचा अंधारावर विजय साजरा करण्याचा म्हणूनही ओळखला जातो.
या दिवसाला महाराष्ट्रात “मोठी दिवाळी” किंवा “देव दिवाळी” असे म्हणतात. या दिवशी विशेषतः शिवमंदिरांत व इतर देवस्थानांत त्रिपुर वाती लावून संपूर्ण मंदिर उजळविण्याची परंपरा आहे. देवळे येथील शिवमंदिरात ही परंपरा शिवकाळापासून अखंडपणे सुरू आहे, आणि आजही ग्रामस्थ तिचा सन्मानपूर्वक पुढे चाल ठेवत आहेत.
ग्रामस्थांच्या एकत्र प्रयत्नांमुळे मंदिर परिसरात स्वच्छता, सजावट आणि दीपोत्सवाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची उपस्थिती होती. सावित्री नदीकिनारी असलेले हे दृश्य जणू देवांनीच दिवाळी साजरी केली, असा भास सर्व उपस्थितांना होत होता.
या दीपोत्सवाचा खरा संदेश म्हणजे — “जे चांगले ते रुजवावे, वाईट ते दूर करावे.”
देवळे ग्रामस्थांच्या भक्तिभावातून साजरा झालेला हा त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा ही परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती यांचा संगम ठरला.
Comments
Post a Comment