महाबळेश्वर–पाचगणी निवडणूक : स्थिर पथक ‘गायब’!रात्री शहरात मोकाट हालचाली – प्रशासन झोपेत की कोणाच्या दबावात?
🚨 महाबळेश्वर–पाचगणी निवडणूक : स्थिर पथक ‘गायब’!
रात्री शहरात मोकाट हालचाली – प्रशासन झोपेत की कोणाच्या दबावात?
✍️महाबळेश्वर/पाचगणी प्रतिनिधी –
सार्वत्रिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी स्थिर पथके रात्रीच्या वेळी प्रत्यक्षात गायब असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश — २४ तास पथक तैनात असणे बंधनकारक. परंतु, रात्री गडद अंधारात महत्त्वाच्या चेकपोस्टवर एकही कर्मचारी दिसला नाही, अशी चिंता वाढवणारी स्थिती नागरिकांनी स्वतः पाहिली.
📌 शहरात सध्या चर्चेचा विषय –
“स्थिर पथक कुठं? आणि घोडेबाजार थांबवणार कोण?”
महाबळेश्वर–पाचगणी परिसरात या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रात्री उशिरा उमेदवार, कार्यकर्ते, मतदार वाहतूक, पैसेवाटप, दारूविक्री, संशयास्पद हालचाली यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी याच पथकांवर असते. परंतु पथकच गायब असल्याने, नागरिकांमध्ये संशयाची पाल चुकचुकू लागली आहे.
एक नागरिक थेट म्हणाला—
“रात्री तपासणीच नाही… मग कोण कुठे जातं, काय घेऊन जातं हे कोण पाहणार? निवडणूक पारदर्शक कशी राहणार?”
🔥 राजकीय वर्तुळात प्रश्नांचा भडका
- घोडेबाजार रोखण्यात प्रशासन सक्षम ठरणार का?
- ही निष्काळजीपणाची झापडझोप की कोणाच्या दबावाखालील सौम्य कारवाई?
- रात्रीचं हे ‘मौन’ कोणाच्या फायद्याचं?
- निवडणूक आयोग तात्काळ चौकशी करणार का?
स्थिर पथक दिसत नसल्याने काही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे. “पथक सतत कार्यरत राहिलंच पाहिजे” अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
🕯️ निवडणुकीच्या मध्यभागी प्रशासनाचे निष्काळजीपण?
महाबळेश्वर–पाचगणी दोन्हीही ठिकाणी निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, प्रशासनाची ही ढिलाई निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
रात्री निर्बंध नसल्याने ‘मुक्त-संचार’ सुरू असल्याच्या चर्चा आता रस्त्यावर येऊ लागल्या आहेत.
जनतेच्या मनात एकच सवाल—
“रात्री स्थिर पथकच नसताना लोकशाहीची सुरक्षा कोण पाहणार?”
Comments
Post a Comment