महाबळेश्वरात रस्त्यावर धुळीचे लोट; पर्यटक आणि नागरिक हैराण!
महाबळेश्वरात रस्त्यावर धुळीचे लोट; पर्यटक आणि नागरिक हैराण!
✍️ जितेंद्र करंडे,
प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर – नंदनवन, मिनी काश्मीर... नाव मोठं आणि रस्ते खड्ड्यांनी भरलेले! थंडगार हवा, हिरवाई आणि सुंदर डोंगर यासाठी प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर सध्या धुळीच्या वाऱ्यांनी झाकून गेलं आहे. शहरात शिरताच पर्यटकांचं स्वागत होतं ते फुलांनी नाही, तर धुळीच्या लोटांनी!
महाबळेश्वर नगरपरिषद क्षेत्रातले आणि आसपासचे प्रमुख रस्ते – पंचगणी रोड, ऑर्थर सीट पॉईंट, वेण्णा लेक, आराम चौक, आणि बाजारपेठेकडे जाणारे मार्ग – हे सगळेच धुळीच्या कहरात सापडले आहेत.
रस्त्यांवरील खड्डे बुजवताना मुरूम आणि माती टाकून काम आटपलं गेलं, पण आता त्याच मातीचा धुरळा नागरिकांच्या श्वासात शिरतोय.
वाहने धावतायत, धुळ उडतेय, आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेले लोक — असंच दृश्य रोज दिसतंय. स्थानिक म्हणतात, “इथे आता वेण्णा लेकपेक्षा धुळीची लेक मोठी झालीये!”
काही दिवसांपूर्वी राज्यपाल महोदय महाबळेश्वरच्या दौऱ्यावर आले, तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागानं घाईघाईत मुरूम टाकून ‘दुरुस्ती’चा दिखावा केला होता.
पाऊस पडताच तो मुरूम चिखलात बदलला आणि आता उन्हाने तीच माती धुळीत बदलून त्रास देत आहे. नागरिक म्हणतात, “मान्यवर येतात तेव्हा फक्त फोटोसाठीच काम होतं, आम्ही मात्र धुळ खातो!”
या सततच्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या अॅलर्जी अशा तक्रारी वाढत आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही इशारा दिला आहे – “ही धुळ आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास दम्याचे आजार वाढू शकतात.”
पुणे-मुंबईहून आलेले पर्यटक संतप्त आहेत.
“महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचं ठिकाण असं ऐकलं होतं, पण इथे तर धुळीतच डोंगर हरवलेत! चेहऱ्यावर मास्क नसेल तर काही दिसतच नाही,” असं त्यांनी सांगितलं.
काहींनी तर थेट सांगितलं – “अशी परिस्थिती राहिली तर पुढच्या वेळी महाबळेश्वरला येणार नाही.”
महाबळेश्वर हे राज्याच्या महसुलाचं मोठं पर्यटन केंद्र आहे, तरीसुद्धा एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन खात्यांचं दुर्लक्ष स्पष्ट दिसतंय.
स्थानिक प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार केला असला तरी काम फक्त फाईलपुरतं मर्यादित आहे.
माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे –
“प्रत्येक मान्यवराच्या दौऱ्यावेळी मुरूम टाकून फोटोसेशन करणं बंद करा. कायमस्वरूपी डांबरीकरण करा!”
नंदनवन की धुळवन?
थंड वाऱ्यांच्या जागी आता महाबळेश्वरात धुळीचे वारे चाललेत.
पर्यटन हंगाम जवळ आला असताना ही अवस्था कायम राहिली, तर पर्यटकसंख्या घटेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल.
महाबळेश्वरचं सौंदर्य सध्या धुळीच्या पडद्यामागे लपलंय.
पर्यटक आणि नागरिक दोघेही म्हणतायत — “रस्ते नव्हेत, संकटाचा धुरळाच उडतोय!” 💨
Comments
Post a Comment