महाबळेश्वरचे नंदनवन अवकाळी पावसाने त्रस्त; छोटे-मोठे व्यावसायिक कर्जबाजारीपणामुळे हैराण
महाबळेश्वरचे नंदनवन अवकाळी पावसाने त्रस्त; छोटे-मोठे व्यावसायिक कर्जबाजारीपणामुळे हैराण
✍️ जितेंद्र करंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर, दि. ३१ : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर सध्या अवकाळी पावसाच्या विळख्यात सापडले आहे. नवमीपासून कोसळणाऱ्या या सततच्या पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, छोटे-मोठे व्यावसायिक अक्षरशः कोलमडून पडले आहेत. हवामानातील अनिश्चिततेमुळे पर्यटन उद्योग ठप्प झाला असून, स्थानिक अर्थचक्राला मोठा फटका बसला आहे.
पर्यटननगरी महाबळेश्वरचा नाताळ आणि नववर्ष स्वागताचा हंगाम आता अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना, सततचा पाऊस आणि कमी झालेली पर्यटकांची ये-जा यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत. कोरोनानंतर मोठ्या कष्टाने पुन्हा उभारी घेणारा व्यवसाय आता पावसामुळे पुन्हा अडचणीत आला आहे. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, टॅक्सी चालक, फोटोग्राफर, स्थानिक दुकानदार, हॉट कॉर्नर विक्रेते – सर्वच या परिस्थितीने त्रस्त झाले आहेत.
“आमच्याकडे ग्राहक नाहीत, विक्री नाही, पण खर्च वाढले आहेत. भाडे, वीज, आणि कामगारांचे वेतन भरताना कर्ज घ्यावे लागतेय,” असे एका व्यापाऱ्याने सांगितले. अनेकांनी बँक व खासगी कर्जे घेतली असून, हप्ते थकले आहेत. कर्जबाजारीपणाच्या चक्रात अडकलेल्या या व्यावसायिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरीही याच परिस्थितीचा बळी ठरत आहेत. भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी कापणीपूर्वीच पीक पुन्हा फुटायला लागले आहे. “पिक तयार आहे, पण पाऊस थांबत नाही. फुटवा आला तर सर्व वाया जाईल,” अशी हतबल प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. काही भागात भाताच्या रोपांचे पाणी साचल्याने कुजण्याचे प्रकारही वाढले आहेत.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचा गारवा आणि पर्यटनाची गर्दी अनुभवणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदा ओलसर, धुकट वातावरणामुळे सुट्टीसाठी येणारे पर्यटक कमी झाले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आंशिक सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी स्थानिक व्यापारी ‘पाऊस जाईल का?’ या प्रश्नानेच गोंधळले आहेत.
अवकाळी पावसामुळे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तिघेही अडचणीत आले आहेत. कर्जबाजारीपणाने त्रस्त झालेले छोटे-मोठे व्यवसायिक आता नाताळच्या सीझनकडे शेवटच्या आशेने पाहत आहेत.
महाबळेश्वरच्या अवकाळी पावसाने पर्यटन आणि शेती अर्थव्यवस्थेला झटका दिला आहे.
पण निसर्गाचा हा तडाखा सहन करून महाबळेश्वर पुन्हा उजळून निघेल, अशी आशा स्थानिकांना आहे.
Comments
Post a Comment