रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप
तापोळा – प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनाट, तापोळा, आंबेनळी परिसरात रानगवे, रानडुक्कर यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा वनविभागाकडे लेखी तक्रारी करून गस्त वाढविणे, सापळे लावणे, आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु, विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणारा आहे. भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच बंद केले आहे. तरीसुद्धा प्रशासन आणि वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांनी तातडीने या परिसरात वनविभागाच्या गस्त पथकांची नियुक्ती करावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच गव्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
---
Comments
Post a Comment