महाबळेश्वर–क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले; नागरिक त्रस्त, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर–क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले; नागरिक त्रस्त, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –
पर्यटननगरी महाबळेश्वरला क्षेत्र महाबळेश्वरशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण गेली दोन वर्षे सुरू असूनही आजतागायत पूर्ण झालेले नाही. पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या या मार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यात संबंधित प्रशासन आणि ठेकेदार संस्था पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच पर्यटक त्रस्त झाले असून, श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वेण्णा लेक ते क्षेत्र महाबळेश्वर हा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. काँक्रीट रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असले तरी नियोजनाच्या अभावामुळे आजही रस्ता उखडलेलाच आहे. त्यातच महाबळेश्वर नगरपालिकेने विविध विकासकामांच्या नावाखाली रस्त्याचे खोदकाम केल्याने मार्गातील मोठा पट्टा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. काही ठिकाणी तर खडी, माती आणि उघड्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सीझनमध्येच कामे सुरू – प्रशासनाचा बेफिकिरीचा नमुना
महाबळेश्वरचा पर्यटन हंगाम सुरू असतानाच रस्त्यांची कामे सुरू ठेवणे हा प्रशासनाचा अजब कारभार नागरिकांच्या रोषास कारण ठरत आहे. ऑफ सीझनमध्ये कामांना सुरुंग लागून सीझनच्या काळातच मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जाते. परिणामी वाहतूक कोंडी, तासन्तास लांबलेले प्रवास, पर्यटकांची गैरसोय आणि स्थानिकांच्या रोजच्या कामकाजात अडथळे असे चित्र या रस्त्यावर घडत आहे. पर्यटकांना त्रास दिला जात असूनही त्यांच्याकडून टोल मात्र नियमित आकारला जातो, ही जनतेच्या रोषाची मुख्य बाब म्हणून पुढे येत आहे.
निकृष्ट कामगिरीची उघडकी – रस्ता खचतोय, मोऱ्यांचे काम ठप्प
काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचा पाया पुरेसा नसल्यानं रस्ता खचलेला दिसून येतो. वॉल-कंपाउंडची कामे न केल्याने रस्त्याच्या कडेला माती वाहून गेली आहे. जलनिस्सारणाची सोय नसल्याने पावसाळ्यात या मार्गावर चिखल, साचलेले पाणी आणि खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येईल, अशी नागरिकांची भीती आहे. विशेष म्हणजे, एका ठिकाणी मोरीचे काम पूर्ण न झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले असतानाही प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे.
ग्रामस्थ आक्रमक – टोल बंदीचा इशारा
रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. "काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करावी," अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच उर्वरित रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याऐवजी वेळ वाचवण्यासाठी दर्जेदार डांबरीकरण करावे, अशीही मागणी पुढे आली आहे. कारण आतापर्यंत झालेले सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आणि वेळखाऊ असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले आहे.
प्रशासन मौन – जबाबदार कुणी?
रस्त्याचे काम रखडण्यामागे नेमकी जबाबदारी कोणाची? निधीअभावी काम अडले की ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे? याबाबत महाबळेश्वर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित कंत्राटदार संस्थेकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण मिळालेले नाही. जनता त्रस्त असतानाही प्रशासन मौन बाळगून असल्याने संशयाचे धुके अधिकच गडद होत आहे.
जनतेचा प्रश्न – पर्यटननगरीतच मूलभूत सुविधा नाहीत तर विकास कुठे आहे?
पर्यटन विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने आजतागायत एक साधा रस्ता वेळेत पूर्ण करू शकला नाही. विकासाच्या नावाखाली केवळ कंत्राटदारांची लूट सुरू आहे का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांनी दिलेल्या अंतिम इशाऱ्यानंतर या विषयाकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार की आंदोलनाची ठिणगी उसळणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment