वाईत आदिवासी बांधवांची सहविचार सभा : बाहेरील ‘आयात उमेदवारांना’ विरोधाचा ठराव
वाईत आदिवासी बांधवांची सहविचार सभा : बाहेरील ‘आयात उमेदवारांना’ विरोधाचा ठराव
अनुसूचित जमातीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनाच प्राधान्य देण्याची मागणी
जितेंद्र कारंडे ,
प्रतापगड प्रतिनिधी :
आगामी जिल्हा परिषद तसेच महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी वाई येथील शाखा कार्यालयात आदिवासी जमात बांधवांची सहविचार सभा पार पडली. या सभेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून स्पर्धा करणाऱ्या बाहेरील ‘आयात’ उमेदवारांना विरोध नोंदवत, स्थानिक सामाजिक काम करणाऱ्या व वैधता प्रमाणपत्र असलेल्या भूमिपुत्रांनाच उमेदवारी देण्याची ठराविक भूमिका मांडण्यात आली.
सभेला संस्थेचे संस्थापक व राज्याध्यक्ष अविनाश ठोंबरे, राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन साबळे, संघटक विश्वास रांजणे, चंद्रकांत वाघमारे तसेच सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. भिलार गटातील इच्छुक उमेदवार पंढरीनाथ लांगी व दादा धामूंसने यांनीही सभेला हजेरी लावली.
✅ सहविचार सभेत घेतलेले प्रमुख निर्णय
सभेनंतर एकमताने पुढील भूमिका निश्चित करण्यात आली —
🔹 स्थानिक महादेव कोळी समाजाचे सामाजिक योगदान
निवडणुकीत उतरू इच्छिणाऱ्या उमेदवाराने आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा नीट विचार करावा.
🔹 वैधता प्रमाणपत्रास प्राधान्य
अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र धारक स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य.
परंतु — ‘आयात’ उमेदवारांना अजिबात संधी नाही.
🔹 राजकीय पक्षांच्या धोरणावर नाराजी
स्थानिक आदिवासींना प्रमाणपत्रे व निधी मिळण्यात अडथळे कायम;
विधानमंडळात प्रभावीपणे आवाज न उठल्याने समाजात रोष असल्याचे मत.
🔹 आयात उमेदवारांच्या वैधतेला ‘कायदेशीर आव्हान’
राजकीय पक्षांनी शॉर्टकट म्हणून बाहेरील उमेदवारांची निवड केल्यास —
त्यांचे प्रमाणपत्र कायदेशीररीत्या चॅलेंज करण्याचा इशारा.
🔹 अवैध उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी
नियमबाह्यरीत्या वैधता मिळवून निवडणूक लढविल्यास संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी.
🔹 समाजिक नुकसान करणाऱ्यांना क्षमा नाही
कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणार असल्यास, तडजोड होणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त.
संस्थेचा स्पष्ट संदेश
“एकच धोरण — वैधतेचे तोरण… संघर्ष अस्तित्वाचा — आदिवासींच्या हिताचा… उलगुलान जारी रहेगा!”
आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेने गेली दहा वर्षे साताऱ्यात शासकीय योजना, प्रमाणपत्र वाटप, सांस्कृतिक उपक्रमांद्वारे आदिवासी समाजामध्ये जागृती केली आहे. आगामी निवडणुकांमधूनही हे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment