महाबळेश्वरात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आगमनपर्यटन स्थळाची सुव्यवस्था व जैविक शेतीबाबत दिल्या सूचना
महाबळेश्वरात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आगमन
पर्यटन स्थळाची सुव्यवस्था व जैविक शेतीबाबत दिल्या सूचना
विलास काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी : दि. २५ –
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज राजभवन, महाबळेश्वर येथे आगमन झाले. आगमनानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले.
यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, आणि तहसीलदार सचिन मस्के यांनीदेखील राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजभवन परिसरात पोलीस विभागाच्यावतीने राज्यपालांना औपचारिक मानवंदना देण्यात आली.
पुढील चर्चेदरम्यान राज्यपालांनी महाबळेश्वरच्या पर्यटक सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. “महाबळेश्वर हे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही स्थानिक प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे राज्यपालांनी सांगितले.
तसेच महाबळेश्वर परिसरातील शेतीविषयी समाधान व्यक्त करत त्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी जैविक (ऑर्गेनिक) शेतीकडे वळावे, पर्यावरणस्नेही शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास साधावा, असे आवाहन केले. जैवविविधता आणि पाणीस्रोतांचे संवर्धन करण्यासाठीही त्यांनी उपाययोजनांची सूचना केली.
राज्यपालांच्या स्वागतावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि उपसचिव एस. राममूर्ती हेही उपस्थित होते. राजभवनातील या भेटीमुळे आगामी दिवसांमध्ये पर्यटन सुविधा, शेतकरी कल्याण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने नव्या उपक्रमांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment