महाबळेश्वरात ‘तिसरी आघाडी’चे राजकारण दळू लागले?दिवाळी गाठी-भेटींनी राजकारणात नव्या समीकरणांची कुजबुज
महाबळेश्वरात ‘तिसरी आघाडी’चे राजकारण दळू लागले?
दिवाळी गाठी-भेटींनी राजकारणात नव्या समीकरणांची कुजबुज
जितेंद्र कारंडे ,
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकांची चाहूल लागून दिवाळीचा उत्साह ओसरताच महाबळेश्वरचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक लोकप्रतिनिधींनी मतदारांच्या घरी जाऊन साधलेल्या ओळखी व संवादामुळे शहरातील राजकारणात नवे डावपेच सुरू झाले आहेत. त्यातच विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार एकत्र आल्याचा छायाचित्रफीत संदेश माध्यमांतून वेगाने पसरला असून यामुळे ‘महाबळेश्वरात तिसरी आघाडी?’ अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ही गाठ-भेट मरी पेठ येथील भारतीय जनता पक्षाचे रवींद्र कुंभारदरे, यांच्या घरी झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगराध्यक्ष अफजल सुतार, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सलीम बागवान शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे नगराध्यक्ष पदाचे इच्छुक व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जेष्ठ व्यापारी अतुल सलगरे, तसेच स्थानिक पर्यटन व्यवसायातील उद्योजक अबीद डांगे हे उपस्थित होते.
विरोधी विचारसरणी व पक्षधोरणे असलेले इच्छुक उमेदवार एकत्र बसल्याने शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्याची भावना निर्माण झाली आहे. ही केवळ दिवाळी भेट नव्हती, तर नवीन राजकीय सूत्रांची बीजे रोवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगल्याचे दिसत आहे.
सध्या नगरपरिषदेमध्ये सत्तास्थापनेचे अनेक तिढे निर्माण झाले असून कोण कोणासोबत जाणार याबाबत अनिश्चितता आहे. परिणामी अनेक पक्षांतील असंतुष्ट नेते एकत्र येऊन पर्यायी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या शक्यता व्यक्त होऊ लागल्या आहेत.
निवडणुका अधिक जवळ येत असताना महाबळेश्वरमध्ये पक्षांपेक्षा व्यक्तिमत्त्वे आणि स्थानिक हितसंबंधावर आधारित राजकारण रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आगामी दिवसात अजून कोणते राजकीय सेतू बांधले जातात व कोणते तुटतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment