सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी २२ लाख ५६ हजार रुपयांचा मदतनिधी सुपूर्द
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी २२ लाख ५६ हजार रुपयांचा मदतनिधी सुपूर्द
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पुढाकार घेतला आहे. आज मंत्रालयात झालेल्या समारंभात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बँकेच्या वतीने एकूण ₹1 कोटी 22 लाख 56 हजार रुपयांचा मदतनिधी सुपूर्द करण्यात आला.
या मदतनिधीमध्ये बँकेच्या नफ्यातून ₹1 कोटी रुपये, तसेच संचालक मंडळाच्या मानधनातून आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ₹22 लाख 56 हजार रुपये असा समावेश असून, ही संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्पण करण्यात आली आहे. ही मदत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्वसनासाठी समर्पित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक करत, “अशा संकटाच्या काळात संस्थात्मक आणि वैयक्तिक स्तरावर मिळणारा प्रत्येक हातभार सरकारच्या मदतकार्याला बळकटी देतो,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे चेअरमन श्री. नितीन पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सरकाळे, तसेच संचालक श्री. राजुशेठ राजपुरे आणि श्री. प्रदीप विधाते उपस्थित होते.
चेअरमन श्री. नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले की, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी आणि जनतेसोबत खंबीरपणे उभे राहणे ही बँकेची नैतिक जबाबदारी आहे. शासन आपले कर्तव्य बजावत असताना, नागरिकांनी आणि संस्थांनीदेखील पुढे येणे हे समाजकल्याणासाठी आवश्यक आहे. आमच्या या प्रयत्नातून इतर संस्थांनाही प्रेरणा मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.”
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, ही मदत केवळ आर्थिक नसून सामाजिक बांधिलकीची ठोस जाणीव देणारी ठरली आहे.
Comments
Post a Comment