राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सातार दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करण्याची मागणी
अजित जगताप ,
सातारा प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे २५ वे राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रत हे दिनांक २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रथमच सातारा जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात, अशी कळकळीची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, ढगफुटी व पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळावा, यासाठी राज्यपालांनी थेट शेतात जाऊन पाहणी करावी, असे शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील, धनसिंगकुमार जाधव व प्रभावित शेतकरी वर्गाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मांडले आहे.
---
दोन दिवसीय शासकीय कार्यक्रम
राज्यपालांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे —
शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५
दुपारी १२.३० वा. : राजभवन, महाबळेश्वर येथे आगमन
महाबळेश्वर येथून साताराकडे प्रयाण
दुपारी ३.४५ वा. : कास पठार आणि मुनावळे (ता. जावळी) येथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कार्यक्रमास उपस्थिती
रात्री : राजभवन, महाबळेश्वर येथे मुक्काम
रविवार, २६ ऑक्टोबर २०२५
सकाळी : आर्थर सिट पॉईंट, सावित्री पॉईंट, इलिफनस्टन पॉईंट, कॉटेज पॉईंट येथे पाहणी
दुपारी २.२५ वा. : वेण्णा लेक आणि टेबल लँड पाचगणी भेटी
त्यानंतर : पुण्याकडे प्रयाण
---
दरम्यान, याच कालावधीत फलटण येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार असल्याने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा दुहेरी ताण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---
“राज्यपालांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा” — शेतकरी वर्गाची अपेक्षा
सातारा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिके व शेतीमाल अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक रस्ते व पूरक सुविधा कोलमडल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यात राज्यपालांनी शक्य तेथे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर भेट द्यावी, आर्थिक मदतीची हमी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून झाली आहे.
राज्यपाल हे राज्याच्या प्रशासनाचे संवैधानिक प्रमुख असल्याने, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास ते ‘शेतकऱ्यांचे खरे संरक्षक’ म्हणूनच जनमानसात ठसतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment