भिलारमध्ये स्ट्रॉबेरीनंतर ‘राजबेरी’ची यशस्वी लागवड – तरुण शेतकऱ्याचा नावीन्यपूर्ण शेती प्रयोग देशभर चर्चेत
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुका │ भिलार हे गाव भारतातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘स्ट्रॉबेरीची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. परंतु आता स्ट्रॉबेरीनंतर भिलारने कृषी प्रयोगशीलतेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गावातील प्रगतिशील तरुण शेतकरी विश्वनाथ भिलारे यांनी यंदा लालभडक राजबेरी (Red Raspberry) या उच्च दर्जाच्या बेरी फळपिकाची यशस्वी लागवड करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
🔴
राजबेरीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचा भडक लाल रंग आणि विशेष सुगंधी चव. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अत्यंत जास्त असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हृदयासाठी हितकारक, त्वचेसाठी उपयुक्त आणि आहारात पौष्टिक असल्यामुळे या फळाला भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे राजबेरीला सध्या प्रति किलो २,००० ते ३,००० रुपये एवढा फायदा देणारा दर मिळत आहे.
🌱
भिलारमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीची क्रांती सन १९९२ मध्ये कै. बाळासाहेब भिलारे (दादा) यांच्या माध्यमातून सुरू झाली. त्यांनी या प्रदेशात स्ट्रॉबेरीचे बीज रोवले. त्यांचा वारसा पुढे नेत त्यांचे सुपुत्र नितीन दादा भिलारे यांनी आधुनिक शेतीच्या वाटा शोधण्यास सुरुवात केली. त्याच प्रेरणेने या वर्षी विश्वनाथ भिलारे यांनी भिलारच्या सुपीक मातीत राजबेरीचे रोप लावून प्रयोगशीलतेचे नवे पान उघडले.
या लागवडीपूर्वी श्रीराम विकास सेवा सोसायटी, भिलार यांच्या मार्फत गावात उपलब्ध करून दिलेल्या माती परीक्षण यंत्राद्वारे भिलारच्या मातीत आवश्यक घटक आहेत की नाही याची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली. अनुकूल माती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सुनील नानासाहेब भिलारे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली लागवड सुरू झाली.
🙏
परंपरेप्रमाणे या नव्या पिकाचे पहिले उत्पादन ग्रामदैवत जननी माता यांच्या चरणी अर्पण करण्यात आले. त्यानंतर दुसरी राजबेरीची पेटी माननीय मदत पुनर्वसन मकरंद आबा पाटील यांना नितीन भिलारे यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या अनोख्या कृषी उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
💬
या उपक्रमाबाबत बोलताना नितीन भिलारे म्हणाले:
“महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असला तरी आज संपूर्ण देशात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढली आहे. शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वळणे ही काळाची गरज आहे. राजबेरी, रासबेरी आणि मलबेरी यांसारख्या बेरींची लागवड केल्यास उच्च दरात विक्रीची संधी मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. तरुण शेतकऱ्यांनी धाडसाने प्रयोगशील शेतीकडे वळावे.”
🚜 शेतीला नव्या दिशा
राजबेरीच्या लागवडीमुळे भिलारसह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे. स्ट्रॉबेरीनंतर आता राजबेरी हे भिलारचे नवे ओळखचिन्ह बनू शकते, अशी कृषिप्रेमींत चर्चा आहे.
माझं गाव – माझी बातमी
शेतीतून समृद्धीकडे – भिलारच्या यशोगाथा पुढेही वाचा!
Comments
Post a Comment