महाबळेश्वरमध्ये ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला अवकाळी पावसाचा फटका!लाखो रुपयांचे नुकसान .
महाबळेश्वरमध्ये ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला अवकाळी पावसाचा फटका!
लाखो रुपयांचे नुकसान .
✍️ जितेंद्र करंडे
|प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर : सध्या महाबळेश्वर परिसरात पर्यटकांची वर्दळ सुरू असताना, येथे सुरु असलेल्या ऐतिहासिक बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील दोन दिवसांपासून क्षेत्र महाबळेश्वरातील कृष्णाई मंदिर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे सेटवरील साहित्य, उपकरणे आणि शूटिंग शेड्यूलमध्ये अडथळा निर्माण होऊन निर्मात्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी (दि. 26) दुपारी दोनच्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि चित्रीकरण पूर्णपणे ठप्प झाले. आधीच या ऐतिहासिक चित्रपटासाठी विविध सरकारी परवानग्या घेण्याची प्रक्रिया आव्हानात्मक असताना, प्राप्त परवानगीप्रमाणे केवळ आज (दि. 27) पर्यंतच शूटिंग करण्याची मुदत आहे. त्यामुळे ठरवलेल्या वेळेत चित्रीकरण पूर्ण न झाल्याने निर्मितीसंस्थेची चिंता वाढली आहे.
यासंदर्भात बोलताना चित्रपटाचे युनिट सदस्य संदीप पाटील म्हणाले,
“आम्ही चित्रीकरणासाठी सर्व नियोजन केले होते. मात्र, अनपेक्षित अवकाळी पावसामुळे शूटिंग थांबवावे लागले. पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण चित्रपट पूर्ण करणे आणि वेळेमध्ये काम पार पाडणे हा मोठा ताण आहे.”
या पावसामुळे चित्रीकरणात निर्माण झालेल्या अडथळ्याचा परिणाम पर्यटकांनाही सहन करावा लागला आहे. कृष्णाई मंदिर परिसरात वाहतूक आणि पर्यटकांच्या हालचालीवर मर्यादा आणावी लागल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, ऐतिहासिक घटनांवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागलेले आहे. चित्रीकरणाची मुदतवाढ मिळते का आणि शूटिंग सुरळीत सुरू राहते का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment