सीमेवरील जवानांचे ऑनलाईन औक्षण : वयगावच्या ग्रामस्थांचा अभिनव उपक्रमआजी-माजी सैनिकांचा सन्मान, व्याख्यानमालेची सांगता
सीमेवरील जवानांचे ऑनलाईन औक्षण : वयगावच्या ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम
आजी-माजी सैनिकांचा सन्मान, व्याख्यानमालेची सांगता
विजय जाधव
सातारा प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील वयगाव या गावाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासाचे दैदिप्यमान उदाहरण सर्वांसमोर ठेवले. देशासाठी सीमारेषेवर जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या जवानांचे ऑनलाईन औक्षण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तर गावातील आजी-माजी सैनिकांचा प्रत्यक्ष औक्षण करून विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आणि संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे श्रेय सौभाग्यवती गटविकास अधिकारी, वाई – रूपाली विजयकुमार
परीट यांच्या प्रेरणेला जाते. “आपण सुरक्षित जीवन जगतो ते केवळ आपल्या सैनिकांमुळे. त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन सौ. परीट यांनी यावेळी केले.
सैनिकांचा गौरव
ऑनलाईन औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून खालील जवानांचा सन्मान करण्यात आला –
१) सुभेदार महादेव गेनूबा वाडकर (एअर फोर्स)
२) नारायण विष्णू वाडकर
३) प्रसाद रमेश धनावडे
४) तेजस रमेश वाडकर
५) शैलेश दिनकर वाडकर
६) अमोल विजय वाडकर
या वेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन सैनिकांना सलामी दिली. त्यानंतर पारंपरिक सोने लुटण्याचा सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. महिलांनी “जय जवान, जय किसान” या घोषणेची आठवण करून शेतकरी व गाईंचे औक्षण करून किसानांचाही गौरव केला.
व्याख्यानमालेचा समारोप
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक व्याख्यानमालेचा या कार्यक्रमात समारोप झाला. भारतीय संस्कृती, स्त्रीशक्ती, पालकांसमोरील आव्हाने, मम्मी, मोबाईल व मुले, पर्यावरण संवर्धन, ‘समृद्ध वयगावचा वारसा’ अशा विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेतून ग्रामस्थांमध्ये सामाजिक व वैचारिक जागरूकता वाढली.
प्रदूषणमुक्त सणाची शपथ
यावेळी ग्रामस्थांनी प्रदूषणमुक्त वयगाव घडवण्याचा संकल्प केला.
- प्लास्टिक बंदी
- डॉल्बीबंदी व भोंगेबंदी
- फटाके बंदी
- वीज बचत
या संकल्पांची एकमुखाने शपथ घेण्यात आली.
सांस्कृतिक उपक्रमांची रंगत
सोहळ्याचा शेवट खेळ, पारंपरिक वाद्यांचे सूर, संगीत खुर्ची अशा विविध उपक्रमांनी रंगला. सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग नोंदवला.
वयगावकरांचा हा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता समाजाला प्रेरणादायी ठरेल. सैनिकांचा सन्मान, शेतकऱ्यांचा गौरव आणि प्रदूषणमुक्त सणाची शपथ यामुळे वयगावने खऱ्या अर्थाने “स्वच्छ, समृद्ध व प्रदूषणमुक्त गाव” घडविण्याचा संदेश दिला आहे.
Comments
Post a Comment