महाबळेश्वर पंचायत समिती येथे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत कार्यशाळा संपन्न
महाबळेश्वर पंचायत समिती येथे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत कार्यशाळा संपन्न
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभागृहात आज एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय विभुते (बीडीओ) होते. प्रमुख उपस्थितीत ग्रामविस्तार अधिकारी सुनील पारटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्दिष्ट व त्यामागील शासनाची भूमिका यावर सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामविकासाच्या दृष्टीने गावांचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, आरोग्य, पोषण, महिला सबलीकरण, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आणि डिजिटल ग्रामव्यवस्था याबाबत सखोल चर्चासत्र घेण्यात आले.
गटविकास अधिकारी विजय विभुते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ एक उपक्रम नसून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा एक प्रभावी आराखडा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा सक्षम करून, लोकसहभागातून विकास साधावा. गाव पातळीवरील अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गावं खऱ्या अर्थाने ‘समृद्ध’ होतील.”
त्यांनी पुढे सांगितले की ग्रामपंचायतींनी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करावा, गावातील गरजांनुसार विकास आराखडा तयार करावा आणि सामाजिक जबाबदारीची भावना जोपासावी.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी सुनील पारटे यांनी कार्यशाळेत सहभागी सर्वांना ‘समृद्ध ग्राम, सक्षम पंचायत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी ग्रामीण आरोग्य, महिला-बालकल्याण, आणि ग्रामसंवर्धन यावर विशेष भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यशाळेत सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपल्या गावातील प्रगतीविषयी मते मांडली तसेच योजना अंमलबजावणीसंदर्भात प्रश्नोत्तर सत्रही घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक संघटनेच्या प्रतिनिधींनी केले.
या कार्यशाळेमुळे ग्रामविकासाच्या दृष्टीने एक नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment