मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात हरित क्रांती — 10 हजार वृक्षसंपदेची लागवड पूर्ण
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात हरित क्रांती — 10 हजार वृक्षसंपदेची लागवड पूर्ण
विजय जाधव,
सातारा प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात हरित संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले. तालुक्यात एकाच दिवसात तब्बल 10 हजार वृक्षांची विक्रमी लागवड करून हरित वसंताचा उत्सव साजरा करण्यात आला. या मोहिमेत 32 गावांमध्ये ‘बिहार पॅटर्न’नुसार प्रत्येकी 200 झाडे, तर उर्वरित 67 गावांमध्ये प्रत्येकी 100 झाडे लावण्यात आली. स्मशानभूमी परिसर, गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, देवस्थान परिसर, शिवारातील रस्त्यांच्या दुतर्फा तसेच घराघरांत वृक्षलागवड करून ग्रामस्थांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प पुनरुच्चारित केला.
ही मोहीम मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी वाई तालुक्याच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “वृक्षलागवड हा फक्त उपक्रम नसून पर्यावरण, पाणी, माती आणि ग्रामविकासाचा पाया आहे. वाई तालुक्याने यासाठी घेतलेली तळमळीची पुढाकार पाहून आनंद वाटतो.”
दरम्यान, या हरित उपक्रमाला गती देण्यासाठी प्रकल्प संचालक श्री विश्वास सिद यांनी वेळे (वेळे गाव) येथे वृक्षारोपणात सहभागी होत उपस्थिती नोंदवली. पंचायत समिती वाई येथील ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी राहुल हजारे, रुपेश मोरे, शरद गायकवाड, तर कृषी विभागातून कृषी अधिकारी शांताराम गोळे आणि विस्तार अधिकारी नारायण पवार यांनी गावनिहाय वृक्षलागवड मोहीम दत्तक घेतली. या अधिकारी व टीमने प्रत्येक गावात वृक्षसंगोपन समित्या स्थापन करून वृक्षलागवड टिकवण्याची जबाबदारीही स्वीकारली.
वृक्षलागवड उपक्रमात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, शाळकरी मुले आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. काही गावांनी ‘एक घर – एक झाड’, ‘वृक्षांनो माणूस बनूया’ सारख्या घोषणांद्वारे अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले.
✅ उपक्रमाची वैशिष्ट्ये:
- एकूण गावांचा सहभाग: 99 गावे
- एकूण वृक्षलागवड: 10,000 झाडे
- बिहार पॅटर्न अवलंबणारी गावे: 32
- वृक्षलागवडीची ठिकाणे:
- सार्वजनिक जागा
- शाळा परिसर
- देवस्थान
- स्मशानभूमी
- रस्त्यांच्या कडांवर
- घराघरांमध्ये
या मोहिमेद्वारे वाई तालुक्याने हरित क्रांतीची नवी दिशा दाखवत पर्यावरण संवर्धनात पुढाकार घेतला आहे. या वृक्षांचे संगोपन करून तालुका पाणी, हवा आणि जमिनीच्या आरोग्याचे संतुलन राखण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment