महाबळेश्वर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न
सुशासन, पारदर्शकता व लोकसहभागातून आदर्श ग्रामपंचायती घडविण्याचा संकल्प
महाबळेश्वर प्रतिनिधी ( विलास काळे):
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती महाबळेश्वर येथे दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीतील विभाग प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, कृषी अधिकारी, विविध विस्तार अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन व उद्दिष्टे
संपूर्ण कार्यशाळेसाठी मार्गदर्शन गटविकास अधिकारी मा. विजय विभुते यांनी केले. त्यांनी अभियानाची उद्दिष्टे, प्रश्नावलीतील विविध पॅरामीटर्स आणि मूल्यांकन निकषांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, समृद्धी पंचायतराज अभियानाचे मुख्य ध्येय म्हणजे ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर, आदर्श व लोकाभिमुख बनविणे होय. गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून रोख पुरस्कार व प्रोत्साहन निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अभियानातील प्रमुख घटक
या अभियानात खालील दहा महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे :
- सुशासन व प्रशासनाची पारदर्शकता
- आर्थिक शिस्त व निधीचा योग्य वापर
- स्वच्छता व कचरा व्यवस्थापन
- आरोग्य सेवा व पायाभूत सुविधा
- गुणवत्तापूर्ण शिक्षण
- जलसंधारण व पर्यावरण संवर्धन
- डिजिटल ग्रामपंचायतची अंमलबजावणी
- महिला व युवकांचा सहभाग
- रोजगारनिर्मिती व श्रमदानाचा प्रभाव
- सामाजिक न्याय व लोकसहभाग
प्रश्नावली भरण्याच्या पद्धती, गुणांकन प्रणाली, तसेच मूल्यांकन निकष यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.
कार्यशाळेतील महत्त्वाचे सत्र
या कार्यशाळेत
- प्रश्नावली भरण्याचे प्रात्यक्षिक,
- गुणांकन पद्धतीचे स्पष्टीकरण,
- ग्रामपंचायतींना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना,
- तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.
यामुळे उपस्थितांना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची दिशा मिळाली.
प्रेरणादायी कार्यशाळा
या कार्यशाळेतून महाबळेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना समृद्धी अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आगामी काळात या तालुक्यातील ग्रामपंचायती राज्यस्तरावर आदर्श ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नियोजन व सूत्रसंचालन
या कार्यशाळेचे नियोजन व सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुनील पारठे, सुनील चिकणे, विठ्ठल पवार व ओंकार जाधव यांनी प्रभावीपणे केले. कार्यशाळेच्या समारोपावेळी ग्रामपंचायतींनी सर्व घटकांना सामावून घेत अभियान यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment