कोयना जलाशयातील बार्ज कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक निकाल – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही
कोयना जलाशयातील बार्ज कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक निकाल – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही
प्रतापगड वार्ताहर ( जितेंद्र कारंडे ) :
कोयना जलाशयातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे जलवाहतुकीसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या बार्ज कामगार बांधवांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक निकाल लागला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून या कामगारांना वेतन, भत्ते, मानधन तसेच बार्जच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात आले.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा निर्णय प्रत्यक्षात आणला. यामुळे अनेक वर्षांपासून आर्थिक व सामाजिक असुरक्षिततेत काम करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळाला आहे.
कामगार बांधवांच्या डोळ्यांत समाधानाचा आनंद दिसत होता. या आनंदात व्यक्त झालेली कृतज्ञता मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी मोठा सन्मान ठरली. “कामगार बांधवांच्या ओठांवरचे हास्य हेच माझ्यासाठी खरी प्रेरणा आहे. त्यांचा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण आहे,” असे मंत्री पाटील म्हणाले.
या कार्यक्रमास स्थानिक जनप्रतिनिधी, कामगार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र शेठ राजपुरे उपस्थित होते. त्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत कामगारांच्या जीवनमानात झालेल्या सुधारणेचे महत्त्व अधोरेखित केले.
कोयना जलाशयातील बार्ज सेवा ही महाबळेश्वर तालुक्यासह आसपासच्या गावांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. जलवाहतूक सेवा सुरू राहण्यासाठी कामगारांची भूमिका मोलाची असून, शासनाने त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक निकाल लावल्यामुळे आता या सेवेला नवे बळ मिळाले आहे.
Comments
Post a Comment