महाबळेश्वर ग्रामस्थ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी सज्ज – गटविकास अधिकारी विभुते
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला सातारा जिल्ह्यात ग्रामपातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानातून लोकसहभागाच्या माध्यमातून विकासाची नवी उभारी निर्माण होत असून, श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थ या अभियानात राज्यात अग्रेसर ठरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विभुते यांनी तालुकास्तरीय स्वच्छता मोहिमेतील कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या अभियानात शिक्षण, आरोग्य, पाणी, उपजीविका, कृषी, रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा अशा आठ प्रमुख घटकांवर आधारित १०० गुणांची स्पर्धा आहे. गावोगावी काटेकोर तयारी सुरू असून, उमेद, बांधकाम विभाग आणि इतर सर्व विभागांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे.
गावातील युवक, महिला, व्यापारी असोसिएशन, स्टॉल संघटना, गाईड युनियन, विविध देवस्थान ट्रस्ट, सामाजिक संस्था, हॉटेल असोसिएशन, हॉटेल कर्मचारी, पत्रकार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी या अभियानात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
“गावाबरोबरच कर्मचारी वर्गानेही या अभियानात अग्रेसर ठरले पाहिजे. प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या क्षमतेनुसार काम करत विकास साधला, तर श्रीक्षेत्र महाबळेश्वर गाव निश्चितच राज्यात नावाजले जाईल,” असे विभुते यांनी स्पष्ट केले.
या स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी सेविका, ग्रामरोजगार सेवक, बचत गट कार्यकर्त्या यांसह ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे जनचळवळीचे रूप घेऊन ‘नवे श्रीक्षेत्र महाबळेश्वर’ घडविण्याचे स्वप्न पूर्ण करेल,” असा विश्वास गटविकास अधिकारी विभुते यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment