इन्फ्लुएन्सर्सनी कल्पकतेतून शासकीय योजनांचा सोशल मीडियावर प्रसार करावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा प्रतिनिधी :
“सोशल मीडियाच्या प्रभावाचा उपयोग लोकहितासाठी व्हावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सनी आपल्या कल्पकतेतून योजना समजेल अशा भाषेत मांडून प्रसारित कराव्यात,” असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक इन्फ्लुएन्सर्स उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, नागरिकांचा ओढा सोशल मीडियाकडे वाढत चालला आहे. शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा प्रभावी वापर होणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून योजनांचा अधिकृत मजकूर उपलब्ध करून दिला जाणार असून, तो मजकूराचा गाभा न बदलता इन्फ्लुएन्सर्सनी आपापल्या शैलीत सादर करावा. “तुमच्या सर्जनशीलतेतून केलेला हा प्रसार नागरिकांना सोपा आणि परिणामकारक वाटेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय प्रशासनाकडून लोकहिताचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्या कार्यक्रमांनाही इन्फ्लुएन्सर्सना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सेवा पंधरवडा (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) या कालावधीत विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रत्येक स्वस्तधान्य दुकानाच्या दर्शनी भागात क्युआर कोड लावण्यात येईल. हा कोड स्कॅन करून ग्राहकांना धान्य वेळेत मिळते का, कोट्याप्रमाणे मिळते का अशा प्रश्नांची उत्तरे देता येतील. या उपक्रमाची माहिती आणि प्रसिद्धी करण्याची जबाबदारीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
बैठकीदरम्यान उपस्थित इन्फ्लुएन्सर्सनी विविध प्रश्न मांडले. त्यावर जिल्हाधिकारी पाटील यांनी सविस्तर चर्चा करून समाधानकारक उत्तरे दिली.
Comments
Post a Comment