सातारा जिल्हाध्यक्षपदी रिपब्लिकन नेते संजय गाडे यांची दुसऱ्यांदा निवड
“आंदोलनाचा बादशहा” ठरलेल्या गाडेंच्या नेतृत्वामुळे रिपब्लिकन चळवळीत नवा उत्साह
मेढा प्रतिनिधी (रवी चव्हाण):
सातारा जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात महत्वाची मानली जाणारी रिपब्लिकन पक्षाची जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा रिपब्लिकन (गवई गट) चे ज्येष्ठ नेते संजय गाडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे साताऱ्यातील रिपब्लिकन चळवळीत नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
विद्यार्थीदशेतून चळवळीत सक्रिय
जावळी तालुक्यातील कुसुंबी गावचे सुपुत्र असलेले संजय गाडे हे घराणेशाहीपासून पूर्णपणे दूर राहून सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेते आहेत. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी दलित पँथर व रिपब्लिकन चळवळीत सहभाग घेतला. सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, आंदोलने उभारणे आणि निर्भीड भूमिका घेणे या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना सातारा जिल्ह्यातील वंचित घटकांचा निःस्वार्थी नेता म्हणून मान्यता मिळाली आहे.
राजकीय प्रवास आणि रिपब्लिकन चळवळीतील भूमिका
सातारा लोकसभा निवडणुकीत “तुतारी” चिन्हावर उमेदवारी लढवत गाडे यांनी ३७,०६२ मते मिळवली होती. त्यांच्या लढ्यामुळे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराचा विजयाचा डाव कोसळला आणि निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला. या घटनेमुळे त्यांना "जॉईंट किलर" अशी ओळख मिळाली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी गाडे यांच्या पुनर्निवडीची अधिकृत घोषणा केली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करत गाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि रिपब्लिकन पक्षाचा वारसा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाने सामाजिक न्याय व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी अनेक दशकं संघर्ष केला आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि नंतर राष्ट्रपुरुष दादासाहेब गवई यांनी या पक्षाचे नेतृत्व करून विचारसरणीची मशाल पुढे नेली. त्यांच्या परंपरेतच डॉ. राजेंद्र गवई यांनी “घराणेशाही नको” या ठाम भूमिकेतून नेतृत्व स्वीकारले आहे. त्याच परंपरेत आता सातारा जिल्ह्यात गाडे यांची पुनर्निवड झाली आहे.
आंदोलनांची अनोखी शैली – “आंदोलनाचा बादशहा”
सातारा जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर गाडे यांनी सतत आक्रमक भूमिका घेतली. गरीब मराठा, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. मुंडन आंदोलन, अर्धनग्न मोर्चे, घंटानाद, महाआरती यांसारख्या अभिनव पद्धतींनी त्यांनी आंदोलनाला नवा आयाम दिला. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांना “आंदोलनाचा बादशहा” तसेच “स्वाभिमानी रिपब्लिकन नेता” ही ओळख मिळाली आहे.
राजकीय परिणाम आणि भविष्यातील दिशा
रिपब्लिकन पक्षाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गाडे यांची पुनर्निवड केवळ साताऱ्यातील नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरू शकते. रिपब्लिकन योद्धा व स्थानिक नेते चंद्रकांत दादा कांबळे आणि विशाल कांबळे यांनी या निवडीमुळे पक्षाची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सन्मान व अभिनंदनाचा वर्षाव
गाडे यांच्या पुनर्निवडीनंतर विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त अधिकारी वर्गाने त्यांच्या नेतृत्वामुळे सामाजिक न्यायाची गती वाढल्याचे नमूद केले. शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
शेवटपर्यंत संघर्षाची तयारी
आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय गाडे म्हणाले, “वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला आणि रिपब्लिकन परंपरेला कधीही तडा जाऊ देणार नाही.”
Comments
Post a Comment