शिवथर ग्रामसमृद्धीसाठी गावकऱ्यांची एकजूट
शिवथर ग्रामसमृद्धीसाठी गावकऱ्यांची एकजूट
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यस्तरावरील यशासाठी शिवथर गावाचा निर्धार
विजय जाधव
सातारा प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही केवळ स्पर्धा नसून ग्रामविकासासाठी लोकचळवळ निर्माण करण्याची सुवर्णसंधी आहे. देशपातळीवर आदर्श संसद ग्राम म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवथर गावाने पुन्हा एकदा उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे.
ग्रामपंचायतीत आयोजित मार्गदर्शन सभेत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी गावकऱ्यांना प्रेरित केले. “गावाने मतभेद बाजूला ठेवून अभियानात सर्वांनी एकजुटीने सहभाग घ्यावा. अभियानातून केवळ पारितोषिक नव्हे, तर टिकाऊ विकासाची संकल्पना साध्य व्हावी,” असे आवाहन त्यांनी केले.
लोकसहभागाची नवी शपथ
या सभेत गावातील युवक व महिलांनी १०० पैकी १०० गुणांचे मुल्यांकन मिळविण्याची जबाबदारी स्वीकारली.
युवक नेते किरण साबळे पाटील म्हणाले, “अभियानातून लोकसहभाग वाढवून पुन्हा एकदा गावाचा कायापालट करू या.”
गावातील महिलांनी देखील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, महिला बचत गट सक्षमीकरण, हरित उपक्रम यांत सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिली.
स्थानिक नेतृत्वाचा निर्धार
सरपंच प्रिया साबळे यांनी सांगितले, “गावातील प्रत्येक घटकाने अभियानात सहभागी होऊन राज्यस्तरावर शिवथरचा लौकिक वाढवावा.”
तर गटविकास अधिकारी पवार साहेब यांनी मार्गदर्शन करताना आश्वासन दिले की, “अभियानाच्या काळात प्रशासन गावासोबत उभे राहील. योजनांची अंमलबजावणी, मूल्यमापन व आवश्यक मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल.”
शिवथरची स्पर्धात्मक तयारी
सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावाने स्वच्छता, पाणी संवर्धन, हरित उपक्रम, डिजिटल ग्रामपंचायत, महिला सक्षमीकरण, पारदर्शक कारभार या घटकांवर विशेष भर देण्याचा संकल्प केला आहे.
गावकऱ्यांचा एकमुखी निर्धार असा – “राज्यस्तरावर अग्रस्थान पटकावून शिवथरचा मान वाढवायचा.”
चौकट
“शिवथरने आधी आदर्श संसद ग्राम म्हणून ओळख निर्माण केली. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यस्तरीय आदर्श निर्माण करणे हीच खरी जबाबदारी आहे.”
– डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते
Comments
Post a Comment