साताऱ्यातील शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
साताऱ्यातील शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
सातारा, प्रतिनिधी :
साताऱ्यात दरवर्षी दिमाखात साजरा होणाऱ्या शाही दसरा महोत्सवाला यावर्षी मोठे औचित्य लाभणार आहे. राज्य सरकारकडून या महोत्सवाला “राज्य महोत्सवाचा दर्जा” देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या निर्णयामुळे साताऱ्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अधिक व्यापक पातळीवर झळकणार असून पर्यटक व अभ्यासकांसाठीही हा महोत्सव आकर्षणाचा ठरेल.
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, माजी आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने शाही दसरा महोत्सवाच्या निमित्ताने राज्य महोत्सवाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव दैसई साहेब यांनीही शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने शाही दसऱ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित होईलच, शिवाय राज्य शासनाच्या वतीने महोत्सवासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आयोजनाची व्याप्ती अधिक भव्य होणार असून सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, इतिहासावरील व्याख्याने तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कलांना प्रोत्साहन मिळणार आहे.
या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.
शाही दसरा महोत्सव शतकानुशतके साताऱ्याच्या अभिमानाचा सोहळा राहिला आहे. छत्रपतींच्या परंपरेतून सुरू झालेला हा महोत्सव केवळ धार्मिक किंवा पारंपरिक नसून राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानला जातो. आता राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने साताऱ्याचा हा वारसा संपूर्ण महाराष्ट्रासोबत राष्ट्रीय पातळीवरही उजळून निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment