प्रतापगड मशाल महोत्सव : ३६६ मशालींनी उजळला प्रतापगड, पावसाच्या सरी-धुक्याच्या दुलईत इतिहास जिवंत
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि आई भवानीचे आशिर्वाद घेऊन तेजोमय झालेला प्रतापगड शनिवारी रात्री पुन्हा एकदा उजळून निघाला. नवरात्रोत्सवानिमित्त पार पडलेल्या प्रतापगड मशाल महोत्सवात ३६६ मशालींच्या प्रकाशाने गड झगमगाटला, तर जय भवानी–जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
विशेष म्हणजे, पावसाच्या सरी आणि धुक्याच्या दुलईने या सोहळ्याला अवर्णनीय रुप दिले. मशालींचा लालसर प्रकाश धुक्यात मिसळून गडावर स्वर्गीय वातावरण निर्माण झाले. पावसाच्या थेंबांमध्ये चमकणाऱ्या मशाली जणू स्वराज्याच्या अढळ ज्योतीचे प्रतीक वाटत होत्या.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, अग्नीकलेचे मोहक प्रयोग आणि हजारो शिवभक्तांचा उत्साह यांनी संपूर्ण परिसर जिवंत झाला. पावसाच्या रिप्रेपसुद्धा भक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही; उलट पावसात भिजत जयघोष करणारे शिवभक्त पाहून गडावरचे वातावरण अधिकच थरारक बनले.
या सोहळ्याच्या तयारीसाठी स्वस्तिक ग्रुप पालघर, शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर, स्वराज्य ढोल पथक प्रतापगड यांसह असंख्य संस्था कार्यरत होत्या. प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. सोहळ्याच्या अखेरीस हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यंदा आयोजित केलेली रील स्पर्धा हा कार्यक्रमाचा खास आकर्षण ठरली. तरुणाईने पावसाच्या धारा, धुक्यातील मशाली आणि आतिषबाजीचे क्षण कैद करून सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे हा सोहळा महाराष्ट्रापुरता न राहता जगभर गेला.
प्रतापगड मशाल महोत्सव हा फक्त सांस्कृतिक सोहळा नाही, तर एक संदेश आहे – स्वराज्याची मशाल अजूनही तेजस्वी आहे आणि अधर्माच्या अंधाराला भेदून पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शन करत राहील.
Comments
Post a Comment