माण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा; सरकारकडून नक्कीच मदत मिळवुन देऊ – आश्वासन
माण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा; सरकारकडून नक्कीच मदत मिळवुन देऊ – आश्वासन
माण/म्हसवड प्रतिनिधी :
माण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान, घरे व दुकाने पाण्याखाली जाणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.
पालकमंत्री देसाई यांनी गोंदवले येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. उस, सोयाबीन, भात, मका, तसेच भाजीपाला पिकांवर झालेल्या परिणामामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “आपल्या झालेल्या नुकसानीची योग्य ती नोंद घेऊन सरकारकडून निश्चितच मदत केली जाईल. कोणीही अडचणीत राहणार नाही.” असे आश्वासन दिले.
त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी म्हसवड शहरातील व्यापाऱ्यांशीही संवाद साधला. अतिवृष्टीमुळे अनेक दुकाने पाण्यात बुडाली असून, मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. यावर बोलताना देसाई म्हणाले की, “नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येतील. व्यापाऱ्यांनाही शासन मदतीचा हात देणार आहे.”
या पाहणी दौर्यात महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भेटीत सहभागी झाले.
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर दिलासा निर्माण झाला असून, तातडीने शासकीय मदत मिळावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment