क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकी परिसराची दुरावस्था; ग्रामस्थांतून संताप
क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकी परिसराची दुरावस्था; ग्रामस्थांतून संताप
क्षेत्र महाबळेश्वर प्रतिनिधी (शेखर कदम)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीच्या भोवतालचा परिसर अत्यंत निकृष्ट अवस्थेत पोहोचला असून याकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, पाणीपुरवठा ही रोजच्या जीवनातील मुलभूत गरज असून, या सेवेसाठी ग्रामपंचायतीकडून नागरिकांकडून कर आकारला जातो. तरीदेखील पाणीपुरवठा टाकीभोवतालचा परिसर दयनीय अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी टाकीच्या आजूबाजूचे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत, त्यामुळे खड्डे पडले असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या ठिकाणी कचरा व अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने आरोग्यविषयक धोकाही निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या मते, पाणीपुरवठा टाकी ही गावाच्या जीवनवाहिनीसारखी असून तिच्या परिसराची स्वच्छता आणि सुस्थिती राखणे ही ग्रामपंचायतीची थेट जबाबदारी आहे. मात्र या बाबीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, “ग्रामपंचायतीचा कारभार निष्काळजीपणाकडे झुकला आहे काय?” असा सवाल ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
सध्या तरी ग्रामपंचायतीने या ठिकाणी सुधारणा करण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. ग्रामस्थांनी इशारा दिला की, जर तातडीने परिसर दुरुस्त करून स्वच्छता राखली नाही, तर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आंदोलन उभारतील.
महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळावर अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे नागरिकांचे मत असून, ग्रामपंचायतीने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
Comments
Post a Comment