प्रतापगड मशाल महोत्सव : शिवप्रतापाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करणारा सोहळा
प्रतापगड मशाल महोत्सव : शिवप्रतापाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करणारा सोहळा
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, आई भवानीच्या कृपेने आणि मराठ्यांच्या रक्तघामाने पावन झालेला किल्ला प्रतापगड आजही प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. इथेच अफझलखानाचा वध करून स्वराज्याचा पाया मजबूत झाला, इथेच आदिशक्ती भवानीची स्थापना झाली, आणि इथेच हिंदवी स्वराज्याची मशाल प्रथमच तेजोमय झाली. या इतिहासाचे स्मरण केवळ ग्रंथांतून नव्हे, तर लोकांच्या मनामनांतून होत राहावे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या १५ वर्षांपासून मशाल महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
२०१० मध्ये आई भवानीच्या स्थापनेला ३५० वर्षे पूर्ण होत होती. त्यावेळी प्रतापगडाचे सुपुत्र चंद्रकांत (आप्पा) उतेकर यांनी संकल्पना मांडली की – इतिहासातील त्या अमरत्वाच्या मशालीला पुन्हा तेज द्यावे. पहिल्यांदा ३५० मशालींचा समुद्र पेटवला गेला आणि त्यानंतर दरवर्षी नवरात्रोत्सवात या महोत्सवाने एक पावन परंपरा निर्माण केली.
आज हा सोहळा केवळ एक धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम राहिला नाही, तर तो "शिवप्रतापाची आठवण, शौर्याचा अभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या आदर्शांचा जागर" बनला आहे. मशालींच्या प्रकाशात झगमगणारा प्रतापगड पाहताना प्रत्येकाला जणू शिवकाळ अवतरल्याचा अनुभव येतो. ढोल-ताशांच्या गजरात, आतषबाजीच्या रोषणाईत, आणि हजारो शिवभक्तांच्या जयघोषात निर्माण होणारे वातावरण हे फक्त सोहळेपुरते मर्यादित राहत नाही, तर ते भावी पिढ्यांच्या मनात स्वराज्याविषयी अभिमानाची ज्योत प्रज्वलित करते.
यंदा या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. कारण आई भवानीच्या स्थापनेला ३६६ वर्षे पूर्ण होत आहेत. २७ सप्टेंबर २०२५ रोजी शनिवारच्या रात्री प्रतापगड पुन्हा एकदा मशालींच्या तेजाने उजळून निघणार आहे. या वेळी ३६६ मशाली पेटवल्या जाणार असून, शिवभक्तांना एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी लाभणार आहे.
या महोत्सवाच्या तयारीसाठी स्वस्तिक ग्रुप पालघर, शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर, स्वराज्य ढोल पथक प्रतापगड यांसह असंख्य व्यक्ती आणि संस्था कार्यरत असतात. प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल व पोलीस यांचे सहकार्य हा महोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महाप्रसाद, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीमय वातावरण हे सगळे मिळून हा सोहळा लोकसहभागाचा आणि श्रद्धेचा संगम घडवतात.
यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे "रील स्पर्धा". आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, तरुणाईला इतिहासाशी जोडण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. मशाल महोत्सवाचे दृश्य कैद करून डिजिटल माध्यमांतून जगभर पोहोचवणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे शिवभक्ती आणि आधुनिकता यांचा संगम घडताना दिसतो.
प्रतापगड मशाल महोत्सव केवळ एक सांस्कृतिक घटना नाही, तर तो एक जाज्वल्य संदेश आहे – की स्वराज्याची मशाल आजही विझलेली नाही. अधर्माच्या काळोखाला चिरत, स्वराज्याच्या पराक्रमाचा प्रकाश पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शक ठरणार आहे.
या निमित्ताने आज आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो – आपण फक्त प्रेक्षक म्हणून या सोहळ्याकडे पाहणार आहोत का, की या परंपरेतून शिकून आपल्या जीवनातही स्वराज्याच्या मूल्यांची मशाल पेटवणार आहोत? जर प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात शिवकाळ जागवला, तरच मशाल महोत्सवाचा खरा अर्थ पूर्ण होईल.
म्हणूनच, येत्या २७ सप्टेंबरला, चला आपण सारे प्रतापगडावर जमूया, मशालींच्या तेजात इतिहास पुन्हा जिवंत करूया आणि स्वतःलाच विचारूया – "आपल्यातील मशाल अजून पेटलेली आहे का?"
Comments
Post a Comment