एक साथ सातारा जिल्ह्यात श्रमदानासाठी हजारो हात
एक साथ सातारा जिल्ह्यात श्रमदानासाठी हजारो हात
“स्वच्छता ही सेवा” उपक्रमातून जिल्ह्यात निर्माण झाला आदर्श – लोकसहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ
विजय जाधव
सातारा प्रतिनिधी
“एक दिवस, एक तास, एक साथ, श्रमदानासाठी दोन हात” या घोषणेसह सातारा जिल्ह्यात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील तब्बल १४९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थ, महिला बचत गट, विद्यार्थी, युवक मंडळ, स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागातून हजारो तासांचे श्रमदान होऊन स्वच्छतेचा एक आदर्श निर्माण झाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला. गावोगावी रस्ते, गटारे, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, बसस्थानके, धार्मिक स्थळे, तलाव, पर्यटन स्थळे व पाणवठे यांची व्यापक स्वच्छता करण्यात आली. कचरा संकलनासाठी ट्रॅक्टर, घंटागाड्या, झाडू, घमेली, खोरी यांसारख्या साधनांची प्रभावी तयारी करण्यात आली होती.
गावोगावी स्वच्छतेची चळवळ
या उपक्रमात केवळ श्रमदानच नव्हे, तर स्वच्छता फेरी, मशाल रॅली, सायकल रॅली, स्वच्छता साखळी अशा विविध कार्यक्रमांद्वारे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील ११ ही तालुकास्तरीय महाश्रमदान कार्यक्रमांना भव्य प्रतिसाद मिळाला.
सुपने येथे सीईओ यांचा सहभाग
कराड तालुक्यातील सुपने येथे सीईओ याशनी नागराजन यांनी स्वतः ग्रामस्थांसोबत झाडू हाती घेऊन श्रमदान केले. या वेळी गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सरपंच विश्रांती पाटील, उपसरपंच दादासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“श्रमदान हा संस्कार आहे” – सीईओ
श्रमदानानंतर बोलताना सीईओ नागराजन म्हणाल्या,
“श्रमदान हा फक्त उपक्रम नाही, तर संस्कार आहे. श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी नियमित श्रमदान आवश्यक आहे. ग्रामस्थांनी कचरा वर्गीकरण करून दररोज परिसर स्वच्छ ठेवला, तर गाव निरोगी व स्वच्छ राहील. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गावे निर्माण करण्यासाठी लोकसहभाग अनिवार्य आहे.”
____________________________________
“एक दिवस, एक तास, एक साथ, श्रमदानासाठी दोन हात”
“जिल्ह्यात शेकडो हातांनी केलेल्या श्रमदानातून हजारो तासांची स्वच्छता साध्य झाली आहे. प्रत्येक गावात दर आठवड्याला सार्वजनिक स्वच्छतेचा उपक्रम राबवून सातत्य ठेवले पाहिजे.”
– याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
__________________________________________
Comments
Post a Comment