महाबळेश्वर एस.टी. स्टँडवर कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या धाडसामुळे अनर्थ टळला
महाबळेश्वर एस.टी. स्टँडवर कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या धाडसामुळे अनर्थ टळला
महाबळेश्वर प्रतिनिधी ( विलास काळे)
महाबळेश्वर येथील एस.टी. बस स्थानकावर सोमवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. बदली न झाल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, आगारातील सहकारी कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच तत्परतेने दाखल झालेल्या बचाव पथकामुळे अनर्थ टळला.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शंकर संकपाळ (वय ४४, रा. भोलावडे, ता. भोर, जि. पुणे) आणि त्यांचे सहकारी विनोद शिवाजी सुतार हे दोघेही महाबळेश्वर आगारात कार्यरत आहेत. या दोघांची बदली होत नसल्याने ते काही दिवसांपासून नाराज होते. त्यांनी आगार कार्यालयात बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र, बदलीचे अधिकार विभागीय नियंत्रक, रा.प. सातारा यांच्याकडे असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले होते. याबाबत संकपाळ यांना समजावून सांगण्यात आले तसेच अधिकृत नोटीसही देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.
यानंतर, “तीन तासांत बदलीच्या मागणीवर निर्णय झाला नाही, तर मी आत्महत्या करीन” असा इशारा देत संकपाळ हे थेट बस आगाराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर चढले. पाहता पाहता या घटनेने बस स्थानक परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
बचावकार्याची धावपळ
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ॲम्बुलन्स, नगरपालिकेचा अग्निशामक पथक व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. याचबरोबर पोलीस हवालदार शेलार यांनीही घटनास्थळी हजेरी लावून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.
आगारातील कर्मचारी तसेच काही वरिष्ठांनी संकपाळ यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासभर चाललेल्या समजावणीच्या प्रयत्नांनंतर शेवटी एका सहकाऱ्याच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि संकपाळ यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
या प्रकारामुळे काही काळासाठी एस.टी. स्थानक परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवासी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनेच्या ठिकाणी जमा झाले होते. आगार कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे व धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला, अशी चर्चा शहरात सुरू होती.
या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संकपाळ यांना समुपदेशन देण्यात येणार असून, विभागीय स्तरावर त्यांच्या बदलीच्या अर्जाची नोंद घेण्यात येईल, अशी माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली.
Comments
Post a Comment