काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे – रणजीतसिंह देशमुख
पाचगणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक; युवा नेतृत्वाच्या सहभागातून संघटनवाढीचा संकल्प
पाचगणी प्रतिनिधी :
महाबळेश्वर-पाचगणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पाचगणी येथे झालेल्या या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख अध्यक्षस्थानी होते.
बैठकीदरम्यान रणजीतसिंह देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. विरोधकांना घरबसल्या ठेवायचे असेल तर आपल्या विचारधारेचा ठसा प्रत्येक घराघरात उमटवला पाहिजे. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवा आणि संघटन बळकट करा.”
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते जयदीपदादा शिंदे उपस्थित होते. त्यांनी युवांना पुढाकार घेऊन पक्षाच्या विचारसरणीला व्यापक पातळीवर पोहोचविण्याचे आवाहन केले. “आजची लढाई ही विचारांची आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या लोककल्याणकारी धोरणांचा ठसा पुन्हा उमटविण्याची हीच योग्य वेळ आहे. युवकांनी आघाडी घेतली तर पक्ष निश्चितच ताकदवान होईल,” असे शिंदे यांनी नमूद केले.
बैठकीस ज्येष्ठ नेते किसन शेठ भिलारे, माजी तालुका अध्यक्ष साहेबराव बिरामणे तसेच पाचगणीचे माजी नगरसेवक निसारभाई सय्यद यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकीचे नियोजन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भंडारी यांनी केले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रशांत सोनवणे, ऋतुराज माने, संदीप माने, दानेश देसाई, विनोद माने, विशाल जाधव, प्रशांत सपकाळ, प्रफुल भंडारी, मंगेश यादव आदींचा सहभाग लक्षणीय होता.
बैठकीत कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी ठोस कार्यपद्धती आखण्याबरोबरच संघटनवाढीचा संकल्प केला. पाचगणीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा बुलंद करण्याचा निर्धार या बैठकीतून उमटला.
Comments
Post a Comment