द बर्निंग बसचा थरार : टायर फुटून खाजगी बसला भीषण आग
कशेडी घाटात बस जळून खाक; प्रवासी सुखरूप
पोलादपूर प्रतिनिधी – प्रकाश कदम
मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बोरिवली ते मालवण दिशेने जाणाऱ्या खाजगी बसला टायर फुटल्यानंतर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असली तरी सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास भोगाव गावच्या हद्दीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक सचिन रघुनाथ लोके (वय ३०, रा. खार, मुंबई) आपल्या ताब्यातील मनाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स या खाजगी बसमधून (क्र. MH 02 FG 2121) बोरिवली ते मालवण असा प्रवास करत होता. कशेडी बोगद्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर अचानक टायर फुटला आणि त्याला आग लागली. प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण बस जळून खाक झाली.
या बसमध्ये ४४ प्रवासी, २ वाहक आणि १ क्लीनर असे एकूण ४७ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुणालाही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांचे संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पीएसआय पवार, पो. ह. बामणे, तसेच ठाणे अंमलदार रंजेश पवार, शिंदे, जाधव, खरादे, कदम, मोरे, साळुंखे आणि होमगार्ड जगताप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कशेडी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय संतोष डोलारे, पो. ह. चाटे व मोहिते देखील घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी खेड व महाड नगरपरिषद येथील अग्निशामक बंब पाचारण केले. मात्र आगीचा भडका मोठा असल्याने बस संपूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना मालवण दिशेने जाणाऱ्या इतर वाहनांमध्ये बसून देऊन सुरक्षितपणे पुढे पाठवले.
Comments
Post a Comment