भाजप कामगार मोर्चाचा ठेकेदारांच्या मनमानी विरोधात एल्गार
सातारा : जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांवर अन्याय व शोषण होत असल्याच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाने ठेकेदारांविरोधात एल्गार पुकारला आहे. कामगारांना किमान वेतन न देणे, दीर्घकाळ काम करून घेणे आणि फसवणुकीचे प्रकार वाढल्याने कामगार मोर्चाने शासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात कामगार मोर्चाचे प्रमुख श्री. सनी अशोक मोरे यांनी श्री. गणेश भाऊ ताटे (अध्यक्ष, किमान वेतन अधिनियम महाराष्ट्र राज्य समिती) यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ठेकेदारांच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधले आहे.
कंत्राटी कामगारांची बिकट अवस्था
मोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले लाखो कंत्राटी कामगार अत्यल्प वेतनावर काम करण्यास भाग पाडले जात आहेत. पाणीपुरवठा विभाग, टोल नाके, पथदिवे, वीज बोटिंग, पार्किंग व्यवस्थापन, बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करणाऱ्या या कामगारांना शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी पगार दिला जातो, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
याशिवाय, कामगारांकडून दररोज १२ ते १८ तास काम करून घेतले जाते, मात्र त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला दिला जात नाही. काही ठिकाणी तर कामगारांना १२ हजार रुपयांचा पगार दिला जाईल असे आश्वासन देऊन फसवणूक केली जात असल्याचा आरोपही मोर्चाने केला आहे.
ठेकेदार व उपठेकेदारांवर कारवाईची मागणी
कामगार मोर्चाने शासनाला मागणी केली आहे की, या प्रकरणी ठेकेदार व उपठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व कंत्राटी कामगारांना त्यांचा हक्काचा पगार आणि न्याय्य सुविधा मिळाव्यात, यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात.
कामगार संघटनांचे स्वागत
ही बाब जिल्ह्यातील कामगार वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या विविध संघटनांनी भाजप कामगार मोर्चाच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, शासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आता शासन आणि संबंधित यंत्रणा या प्रश्नावर कोणती पावले उचलतात, याकडे कामगार तसेच समाजाचे लक्ष लागलेले आहे.
Comments
Post a Comment