सोळशी नदीकाठच्या गावांची पाहणी; स्थलांतरित कुटुंबांना दिलासा
गटविकास अधिकाऱ्यांसह महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची हजेरी
तापोळा/प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. परिणामी सोळशी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. 20 ऑगस्ट रोजी प्रशासनाने प्रत्यक्ष गावांची पाहणी करून पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान वेंगळे, खांबील, चोरघे, देवसरे, येणे बु आणि खुर या गावांना भेट देण्यात आली. विशेषतः येणे बु गावातील काही कुटुंबांना पूरस्थितीमुळे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तात्पुरत्या निवाऱ्यात त्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली.
स्थलांतरित कुटुंबांना पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची काटेकोर चौकशी अधिकाऱ्यांनी केली. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे आश्वासन गटविकास अधिकारी विजय विभुते यांनी दिले.
यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी, तसेच इतर आपत्कालीन सेवा यंत्रणा उपस्थित होती. पाहणीवेळी काही ठिकाणी नदीकाठची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन तातडीने खबरदारीचे उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.
प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या भागांमध्ये अनावश्यक गर्दी न करण्यास सांगितले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे धोका अद्याप कायम असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने वेळेवर दाखल होऊन दिलासा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील ग्रामस्थांनी यावेळी केली.
Comments
Post a Comment